वसई विरार महापालिकेकडून विविध कामांसाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांपैकी काही रस्त्यांवर डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र, हे डांबरीकरण अशा पद्धतीत केले गेले आहे की रस्त्यावर असणारे गतिरोधक आता वाहनचालकांना दिसेनासे झाले आहेत.यामुळे मोकळ्या रस्त्यावरून सुसाट प्रवास करू पाहणाऱ्या वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे.
वसई विरार महापालिकेकडून गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून जलवाहिन्या अंथरणे, तसेच गटारांची बांधणी अशी विविध प्रकारची कामे केली जात आहेत. या कामांसाठी पालिकेने नियुक्त केलेल्या ठेकेदारांनी रस्त्याच्याकडेला तर काही ठिकाणी अगदी रस्त्याच्या मधोमध खोदकाम करून ठेवले होते. या खोदकामामुळे हे रस्ते खडी आणि धुळीने माखले होते. त्यामुळे वाहनचालकांना धुळीचा तसेच खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत होता.
तर काही ठिकाणी खोदलेल्या रस्त्याचा अंदाज न आल्याने वाहनचालकांचे अपघातही घडले होते. यात काहींना किरकोळ दुखापत झाली होती. तर काहीजण गंभीर जखमीही झाले होते. त्यामुळे रस्ते दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती. मात्र, इराण इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असणाऱ्या युद्धामुळे डांबर उपलब्ध होत नसल्यामुळे काम अतिशय संथ गतीने सुरु होते.
मात्र, कालांतराने सुधारलेली परिस्थिती आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेत. खोदलेल्या सिमेंट-काँक्रीटच्या बहुतांश रस्त्यांवर आता डांबराचा मुलामा चढवण्यात आला आहे. मात्र डांबरीकरण करताना ते अशा पद्धतीत करण्यात आले आहे की, झेब्रा क्रॉसिंग, गतिरोधक यात लुप्त झाले आहेत.
वसईतील प्रत्येक गतिरोधकाआधी काही सूचना फलक लावण्यात आलेला नाही. त्यामुळे दुरून पाहिल्यावर पांढऱ्या पट्ट्या असणारा उंचवटा दिसला म्हणजे पुढे गतिरोधक असल्याचे कळत होते. मात्र, आता केलेल्या डांबरीकरांमुळे हा अंदाजच येत नाही. अगदी गतिरोधकाच्या जवळ पोहोचलो की लक्षात येतं की रस्त्यात गतिरोधक आहे. यामुळे वाहन चालवताना खूप गोंधळ होतो, अशी प्रतिक्रिया दुचाकी चालक विजय पाटील यांनी दिली.
तर दुसरीकडे झेब्रा क्रॉसिंग पट्टेदेखील या डांबरीकरणामुळे नाहीसे झाले असल्यामुळे सिग्नल नसलेल्या रस्त्यांवर रस्ता ओलांडणे पादचाऱ्यांना कठीण होऊन बसले आहे. रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग नसल्याने भरधाव जाणारे वाहनचालक पादचाऱ्यांना न जुमानता आपली वाहने हाकत असल्यामुळे रस्ता ओलांडणाऱ्यांना बराच वेळ एकाच ठिकाणी थांबून रहावे लागते.











