संगमेश्वर तालुक्यातील लोवले येथील संतोष प्रदीप खेडेकर यांच्या कोरड्या विहिरीमध्ये पाच गवे पडल्याची घटना बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.
वन विभागाला याची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन गव्यांना बाहेर काढण्यासाठी वनाधिकाऱ्यांनी रेस्क्यू ऑपरेशन केले. जेसीबीने रस्ता तयार करून पाचही गव्यांना सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडले.
यासंदर्भात कृषी सहाय्यक समीर दोरखडे यांनी वनविभागाला (Forest Department) माहिती दिली. परिमंडळ वन अधिकारी संगमेश्वर देवरूख व सर्व स्टाफ मिळून आवश्यक साहित्यासह प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. तेव्हा विहीर कोरडी असल्याचे दिसून आली. विहीर सुमारे १५ ते २० फूट खोल व सुमारे पंधरा फूट व्यासाची होती.
विहिरीची बॅटरीच्या उजेडात पाहणी केली तेव्हा दोन पूर्ण वाढ झालेले गवे व तीन छोटे असे मिळून ५ गवे विहिरीत अडकल्याचे दिसून आले. विहिरीची उंची जास्त असल्याने त्यांना विहिरीबाहेर पडता येत नव्हते. या स्थितीची पाहणी केली असता पडीक विहिरीला एका बाजूने जेसीबी वापरून वाट तयार करून विहिरीत अडकलेल्या गव्यांना नैसर्गिकरित्या रस्ता करून देण्यात आला.
पाच गवे सुरक्षित सुमारे रात्री १:३० वा बाहेर काढण्यात आले. हे रेस्क्यू ऑपरेशन विभागीय वनाधिकारी रत्नागिरी चिपळूण गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड, परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल संगमेश्वर देवरूख सागर गोसावी, वनरक्षक फुणगूस आकाश कडूकर, वनरक्षक आरवली सूरज तेली व वनरक्षक साखरपा सहयोग कराडे यांनी केली.











