दीक्षाभूमी परिसरातील डाॅ. आंबेडकर महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आर्थिक, मानसिक त्रास दिल्या प्रकरणी विद्यापीठात देण्यात आलेल्या तक्रारीची चौकशी करणाऱ्या समितीला व्यवस्थापनासह प्राचार्यानी असहकार्य केल्याची माहिती समोर आली.
बुधवारी (ता.११) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास समितीने महाविद्यालयाला भेट देत, तक्रारकर्ता, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
दीक्षाभूमीतील डॉ. आंबेडकर महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार आणि अनियमितता असून शिक्षकांसह शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास देण्यात येत आहे. याबाबत विद्यापीठाला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून त्याच्या चौकशीची मागणी अधिसभा सदस्य डॉ. नितीन कोंगरे यांनी बैठकीत केली होती. त्यावर विद्यापीठाने या संपूर्ण तक्रारीच्या चौकशी उच्चस्तरीय चौकशी समितीद्वारे करण्यात येणार असल्याची घोषणा केली.
याशिवाय निःपक्षपणे चौकशी होण्यासाठी तक्रार करणाऱ्यांना संरक्षण दिल्या जाईल असे स्पष्ट केले. तशी नोटीस गेल्यावर बुधवारी समिती येईल अशी माहितीही प्राचार्यांकडून शिक्षकांना देण्यात आली नव्हती. बुधवारी सकाळी समितीने महाविद्यालयात प्रवेश केल्यावर प्राचार्य आणि प्रशासनाकडून समिती व अन्य प्रशासनाने कुठल्याही प्रकारचे सहकार्य करण्यात आले नाही. यानंतर समितीच्या सदस्यांनी तक्रार करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी प्राध्यापकांनी महाविद्यालय प्रशासनाच्या विरोधात प्रचंड तक्रारींचा पाऊस पाडल्याची माहिती आहे. महाविद्यालयाकडून होणाऱ्या मानसिक दडपणामुळे शिक्षकांना त्रास असून अनेक कामांसाठी पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
अशा आहेत तक्रारी
एका महिला प्राध्यापिकेने विद्यापीठाकडे आतापर्यंत २० तक्रारी दाखल केल्या. त्यावर विद्यापीठ प्रशासनाने महाविद्यालयाला तीन वेळा पत्रे पाठवली; मात्र कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत पदोन्नतीचे प्रस्ताव मुद्दाम प्रलंबित ठेवण्यात आले असून, हे काम लवकर करून देण्यासाठी २ लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचाही तक्रार आहे. विशेष म्हणजे पैशाची मागणी करणारा व्यक्ति महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाशी संबंधित नसल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याला त्रास सहन करावा लागत असून त्यांचे काही महिन्यांचे वेतन रोखून धरण्यात आल्याची तक्रार आहे. याशिवाय महिला शौचालयांची दयनीय अवस्था असून सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावून कर्मचाऱ्यांवर पाळत ठेवली जात असल्याचा आराेपही करण्यात आला











