राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यांच्या निधनानंतर चौथ्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात अनेक शंका आणि प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यांच्याच राष्ट्रवादीच्या आमदार आणि नेत्यांनी हा अपघात की घातपात असा सवाल केला आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘विमानात अजितदादांसोबत भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती?’, असं खळबळजनक विधान केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले. तसंच त्यांनी यावेळी भाजपवर देखील जोरदार निशाणा साधला. ‘शरद पवारसाहेबांनी क्लिअरिटी जरी पहिल्या दिवशी केली. पण त्यांना हळूहळू कळेल की हे प्रकरण साधे नाही. अजित पवारांचे स्वगृही जाणे हा भाजपचा पराभव. देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारा तो निर्णय ठरला असता. अजित पवार मागे गेले असते तर भाजपची दहशत ती मोडून गेली असती. अजित पवार वारंवार सांगत होते की माझ्याकडे भाजपच्या घोटाळ्याची फाईल आहे आणि मी ती उघड करेल. हे त्यांनी १५ जानेवारीला सांगितले आणि पुढच्या १० दिवसांत त्यांच्या विमानाचा अपघात होतो हे रहस्यमय आहे.’, अशी शंका संजय राऊतांनी उपस्थित केली.
भाजपच्या घोटाळ्याच्या फाईल अजितदादांसोबत विमानात होत्या? असं खळबळजनक विधान राऊत यांनी केले. ते म्हणाले की, ‘मी कुणावर आरोप करत नाही पण लोकांच्या मनातील शंका आहेत. अमोल मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केले हे गंभीर स्वरूपाचे प्रश्न आहेत. लोकांच्या मनात अशा शंका येणार आहेत. अजित पवार जेव्हा म्हणाले की भाजपच्या घोटाळ्याची फाईल माझ्याकडे आहे आणि मी ती योग्य वेळी उघड करेल असं तेव्हाच माझ्या मनात शंका आली. याचा अर्थ असा होता की अजित पवारांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. सिंचन प्रकल्पाचे बजेट वाढवून ते पैसे पक्ष निधीमध्ये कसे वळवले हे जेव्हा अजित पवार सांगत होते तेव्हा त्यांचे बॉडी लँगवेज मी पाहिले तेव्हा स्पष्ट दिसत होते की त्यांना स्वगृही परत जायचे आहे.’
प्रफुल्ल पटेल हे एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष असे पियुष गोयल म्हणाले त्यावर संजय राऊत म्हणाले की, ‘अजित पवार यांचा पक्ष आता पवार- पाटलांचा पक्ष राहिलेला नाही. तो आता गोयल, पटेल, पारेख, शहा, मोदी यांचा पक्ष होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांचा पक्ष हा मराठमोळा चेहऱ्याचा पक्ष होता. तो मूळ पक्ष शरद पवारांचा आहे. डाके- दरोडे टाकून तो अमित शहा यांनी त्यांच्या हातात दिला आणि स्वत:चे लेबल त्याला लावले. सुरूवातीला तो शहांचा पक्ष होता. आता तो पटेलांचा पक्ष होईल. अशातऱ्हेने महाराष्ट्रातला एक प्रादेशिक अस्मिता जपणारा पक्ष भारतीय जनता पक्षाने गिळून टाकला. याबद्दल तर त्या पक्षातील मराठी आमदारांना आणि खासदारांना आनंद होत असेल तर त्यांनी स्वत:ला मराठी समजू नये.’
तसंच, ‘अजित पवार यांनी कधीही भारतीय जनता पक्षाच्या अजेंट्यावर काम केले नाही. सत्तेसाठी एकत्र आले. त्यांच्यावर काही संकट भाजपने लादली. घोटाळ्याचे आरोप झाले, ईडी -सीबीआय मागे लावले. इतर राजकारणी जे करतात तेच त्यांनी केले. तेवढ्यापूरते ते भाजपला सरेंडर झाले. आपल्यावरच्या फाईली क्लिअर करून घेतल्या शहाणपण्याने. त्यानंतर ते पुन्हा एकदा ते स्वगृही परत येण्याची धडपड करत होते. त्याआधी त्यांनी कधीच भाजपचा अजेंड्यावर काम केले नाही. त्यांनी जातीपातीवर काम आणि राजकारण केले नाही.’, असे देखील राऊत म्हणाले.











