श्रीवर्धन, बोर्ली आणि दिवेआगर यांसारख्या पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या मार्गावर पर्यटकांच्या बेदरकार वाहनांमुळे अपघातांचे सत्र सुरूच आहे.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर, म्हसळा शहरातील सजग नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, रायगडच्या पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले आहे.
बोर्ली आणि दिवेआगर ही ठिकाणे जागतिक स्तरावर पर्यटनासाठी प्रसिद्ध असल्याने सुट्टीच्या काळात येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. मात्र, याच गर्दीचा फायदा घेत अनेक पर्यटक वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत आहेत. अतिवेग आणि बेदरकार ड्रायव्हिंग, मद्यपान करून वाहन चालवणे आणि रस्त्यांवरील अपुरी सुरक्षा यंत्रणा अपघातांना निमंत्रण देत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, परिसरात भीतीचे वातावरण आहे. याविरोधात म्हसळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्याकडे निवेदन सोपवण्यात आले. स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या पर्यटकांवर कठोर कारवाई व्हावी, हीच आमची मागणी आहे, असे मुसद्दीक इनामदार यांनी म्हटले आहे. या वेळी संजय खांबेटे, दीपल शिर्के, नंदू शिर्के, सलीम बागकर, शाहिद जंजीरकर, रियाज घराडे, दिलीप करमरकर, सरफराज दर्जी, निहाल पेणकर, शगुप्ता जहांगीर यांसह शहरातील अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या
भविष्यातील जीवितहानी टाळण्यासाठी म्हसळावासीयांनी प्रशासनाकडे ठोस उपाययोजनेची मागणी केली आहे. मुख्य मार्गांवर आणि अपघातप्रवण क्षेत्रांत पोलिस बंदोबस्त वाढवणे. मद्यपीचालकांसाठी ड्रिंक अँड ड्राइव्हची नियमित तपासणी मोहीम राबवणे. वेगमर्यादा दर्शविणारे फलक आणि आवश्यक ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवणे. रात्रीच्या वेळी होणारी हुल्लडबाजी रोखण्यासाठी पोलिस पेट्रोलिंग वाढवणे, अशा प्रमुख मागण्या निवेदनात केल्या आहेत.
फोटो -मद्यधुंद बेदरकार पर्यटकांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी म्हसळ्यातील नागरिकांनी पोलिस निरीक्षक रवींद्र पारखे यांना निवेदन दिले.











