उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला कारणीभूत ठरलेल्या विमान अपघातानंतर आता तपासाला वेग येताना दिसतो आहे. अपघातानंतर पाच-सहा दिवसांनी प्रशासनाच्या वतीने अपघातस्थळावरून विमानाचे सर्व सुटे भाग एकत्र करून बॉक्समध्ये भरले आहेत; तसेच विमानाचा अर्धा भाग स्वतंत्र कंटेनरमध्ये ठेवून तोही मुंबईकडे रवाना केला जाणार आहे.
हे सर्व अवशेष पुढील तांत्रिक आणि फॉरेन्सिक तपासासाठी पाठवले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. तर नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही बारामतीला रवाना झाल्या.
अपघातग्रस्त विमानाचे अवशेष मुंबईला
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या अपघातग्रस्त विमानाच्या अवशेषांतून नेमके काय निष्पन्न होणार, अपघाताचे खरे कारण काय समोर येणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांच्या मृत्यूमागील सत्य उघड होणार का, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. अपघातग्रस्त विमानाचे अवशेष प्रशासनाकडून तांत्रिक व फॉरेन्सिक तपासासाठी मुंबईला नेले जात आहेत.
ब्लॅक बॉक्स, इंजिन, कंट्रोल सिस्टीम, मेटल फ्रॅक्चर यांचा अभ्यास करून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचा दावा आहे. मात्र, तपासासाठी असेल, तर अपघातानंतर तत्काळ जप्ती का झाली नाही, अवशेष हलवण्यासाठी पाच दिवस का लागले, या विलंबामुळे पुरावे नष्ट झाले असतील का, यावर संशय व्यक्त केला जात आहे.
सुनेत्रा पवार बारामतीत
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्या बारामतीत दाखल झाल्या. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी कोणताही संवाद साधला नाही. मात्र, सायंकाळी काटेवाडी येथे जाऊन सासू आशाताई यांचे आशीर्वाद घेतले. या वेळी त्यांच्यासोबत पार्थ पवार होते.
अजितदादांच्या स्मृतिस्थळाबाबत चर्चा
बारामती सोडून मुंबईला रवाना होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि प्रतिभा पवार यांनी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान परिसरात, जिथे अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते, त्या स्थळाला भेट दिली. तेथे त्यांनी विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर यांच्याशी अजित पवारांच्या नियोजित स्मृतीस्थळासंदर्भात चर्चा केली.
‘अजितदादांचे स्मारक भव्यदिव्य असावे, अशी पवारसाहेबांची इच्छा आहे. बारामतीत वेगवेगळ्या संकल्पनांतून उभारलेल्या इमारती जशा ओळख निर्माण करतात, तसाच नियोजित स्मृतिस्थळही राज्याला दिशादर्शक ठरेल, अशा स्वरूपात उभारण्याचा मानस आहे,’ असे गुजर म्हणाले. शरद पवार आणि प्रतिभा पवार मुंबईला रवाना झाले, तर सुप्रिया सुळे शनिवारीच दिल्लीला गेल्याचीही माहिती आहे.











