मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचा विजय झालाय तर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचा पराभव झालाय. तसंच राज्यातील 29 महापालिकांपैकी सुमारे 25 महापालिकांमध्ये भाजपा विजयी झाली आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता तर या भाजपच्या 100 पिढ्या उतरल्या असत्या तरी या मुंबईवर महाराष्ट्रद्वेष्ट्यांचा महापौर बसला नसता आणि झेंडा फडकला नसता. ज्यांनी आपल्या मराठी साम्राज्याचा जरीपटका खाली उतरवला आणि त्याच हाताने ब्रिटिशांचा युनियन जॅक शनिवारवाड्यावर फडकवला, त्या बाळाजी पंत नातू आणि जयचंद यांच्या अवलादी असल्याचा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. आता यावरून भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी ठाकरेंवर जोरदार प्रहार केलाय.
मंत्री नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मुंबई अदानींच्याच्या घशात घालण्याला भारतीय जनता पक्षाला यश मिळाला आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी केली. याबाबत विचारले असता नितेश राणे म्हणाले, चंगेज मुलतानीच्या घशात घालणं चालतं. कोण बुरखेवाली बनत असली तर चाललं असतं. पण, अदानींच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि मुंबईचा विकास होईल ते यांना चालत नाही. त्यामुळे या जिहाद्यांच्या घशात घालण्यापेक्षा जे मुंबईचा विकास करू शकतील, त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करू, असे प्रत्युत्तर त्यांनी संजय राऊत यांना दिले.
एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता तर मुंबईत भाजपचा महापौर बसला नसता, असेही संजय राऊत म्हणाले. याबाबत विचारले असता नितेश राणे म्हणाले की, हे पण तर गद्दारच आहेत ना. ज्या शिर्केने छत्रपती संभाजीराजेंची माहिती मुघलांना दिली आणि आमच्या छत्रपती संभाजीराजेंना संगमेश्वरला पकडलं. त्यांच्यामध्ये आणि ठाकरे बंधूंमध्ये अन् त्यांच्या पिल्लावळीत काहीच फरक नाही. पाकिस्तानमध्ये बसलेल्या अब्बाची स्क्रिप्ट हे मुंबईमध्ये वाचून दाखवत होते. हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठीच ठाकरे बंधूंना सुपाऱ्या दिल्या होत्या. म्हणून दुसऱ्या लोकांना नाव ठेवण्यापेक्षा तुम्ही ज्यांची दाढी कुरवळत होते, त्यांना जाऊन उत्तर द्या, अशी टीका त्यांनी केलीय.











