पुणे : “ते दिल्लीला गेल्यानंतर जोपर्यंत वरिष्ठ म्हणून आमच्याच नेत्यांना भेटतायत, तोपर्यंत ते कितीवेळा दिल्लील गेले तरी चालतील. त्यांना गरज असली तर विमान देखील मी उपलब्ध करून देईन, तिकीट काढून देईन. तसे ते माझ्यापेक्षा सक्षम आहेत, पण गरज पडली तर तेही काढून देईन मी. जोपर्यंत आमच्याच वरिष्ठांना भेटतात, तोपर्यंत मी आनंदी आहे,” अशी अजित पवारांविरोधात टोलेबाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज (दि.१३) जाहीर प्रचाराच्या सांगतेपूर्वी केली. शिवाजीनगर मतदारसंघ भाजपला सातत्याने साथ देतो आहे. माझा असा समज आहे की, इथे सभा घेतली तर ती शुभ ठरते. म्हणून इथे सभा घेतली, असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, “राष्ट्रवादीच्या विलिनीकरणा संदर्भात आज बोलणं हे काही योग्य होणार नाही. कारण एक हिंदीतली म्हण आहे; ती अगदी तंतोतंत लागू होते असं नाही, पण ‘कब बाप मरेगा और कब बैल बटेंगे’ असं म्हणतात. अजून काही झालंच नाहीये, अजून विलीनीकरण नाही. त्याच्यावर इतक्या चर्चा कशाला. विलीनीकरण जर झालं तर वरिष्ठ निर्णय घेतील, पण विलीनीकरण झालं तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) राहायचं की नाही, त्याचाही निर्णय घ्यावा लागेल. प्रश्न एवढाच आहे की, या संदर्भात आज बोलणं हे काही योग्य होणार नाही.”
मी राज ठाकरेंना एवढंच सांगतो, सोमवारी मी पुराव्यासहित कशी हिंदी सक्ती उद्धव ठाकरेंनी आणली. दोनवेळा त्याचा कॅबिनेटमध्ये निर्णय केला, हे दाखवलेलं आहे. राजसाहेब, आता तुमचं बंधूंशी पटायला लागलं आहे, त्यामुळे माझ्याशी बोलायच्या ऐवजी हे बंधूंशी बोललं पाहिजे. आपल्या भाषेवर संकट आणणारे तुमचे बंधू आहेत आणि त्यांच्यासोबत तुम्ही युती करताय. त्यामुळे मला असं वाटतं, मी बसवलेला का उठवलेला, मी झोपलेला का जागा, यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेने तीनवेळा मला मुख्यमंत्री बनवलं. दोनवेळा माझ्या नेतृत्वाखाली पूर्ण बहुमत आम्हाला दिलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जनता कोणाच्या बाजूने आहे, हे त्या निवडणुकीतून कळलेलं आहे. पण ठीक आहे, आता राजसाहेबांना मी बसवलेला वाटत असलो तर काही हरकत नाही, अशा शब्दांमध्ये त्यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले.
उद्धव ठाकरे यांनीमतचोरीच्या संदर्भात बोलू नये, कारण त्यांच्यावर नगरसेवक चोरीचा आरोप आहे. राज ठाकरेंचे आठ नगरसेवक होते. ते सगळे चोरून नेण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केले. आता ठीक आहे, त्यांच्यासोबतच राज ठाकरे आहेत; पण अशा प्रकारची चोरी करण्याची प्रवृत्ती ज्यांची असेल. म्हणजे वोट चोरी तर आम्ही करतच नाही, पण वोट चोरीपेक्षा गंभीर आहे की, लोकांच्या मताने निवडून आलेले नगरसेवक चोरायचे. नगरसेवक चोरी त्यांची आहे, असा आरोपही त्यांनी केला.











