मुंबई:- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात पार पडलेल्या जाहीर सभेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सडेतोड भूमिका मांडली. यावेळी त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांबाबत भर सभेत जाहीर दिलगिरी व्यक्त केली. तसेच, रागावून किंवा नाराज होऊन ‘जय महाराष्ट्र’ करत दुसऱ्या पक्षात गेलेल्या कार्यकर्त्यांबाबतही राज ठाकरे यांनी महत्त्वाचं भाष्य केलं.
राज ठाकरे म्हणाले की, मी 20 वर्षांनी पहिल्यांदा युती करतोय. त्यामुळे या युतीच्या प्रक्रियेत अनेक लोकांना तिकीट नाही देता आली, अनेक जण नाराज झाले. काहींना वाटलं दुसऱ्या पक्षात जावं, काही गोष्टी झाल्या आणि होतात. त्या आमच्या हातात नसतं. पण, त्यांना दुखवण्याचा आमचा हेतू नव्हता. तरी जे नाराज झाले असतील त्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो, असे त्यांनी म्हटले.
जे गेले आहेत, ते परत येतील
नाराज होऊन पक्ष सोडलेल्या कार्यकर्त्यांबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “जे गेले आहेत ते आपलेच आहेत. ते परत येतील. कारण आता जे आहेत, ते कुठे जातील याची खात्री नाही. त्यामुळे जे गेले आहेत, ते परत येतील. या सर्व गोष्टींमध्ये मी त्यांना समजू शकतो”, असंही त्यांनी सांगितलं .
दरम्यान, राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कशी जोडलेल्या भावनिक आठवणींनाही उजाळा दिला. “मी लहान असताना बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत या व्यासपीठावर अनेकदा आलो आहे. शिवसेनेची स्थापना याच शिवतीर्थावर झाली. त्यावेळी माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे, वडील श्रीकांत ठाकरे आणि आमची माँ उपस्थित होते. आज मी आणि उद्धव एकत्र आलो असताना, हे सगळे जर इथे हजर असते तर हा क्षण अधिक भावनिक झाला असता. मात्र, मराठी माणसासाठी आणि मुंबईसाठी उभा राहिलेला हा लढा ते वरून नक्कीच पाहत असतील,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्यामागील कारण स्पष्ट करताना सांगितले की, “मी आणि उद्धव एकत्र येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मुंबईवर आलेलं संकट. गेल्या अनेक वर्षांपासून मी सांगतोय की, मुंबईविरोधात कशा पद्धतीने डाव रचला जातोय. हिंदी सक्तीचा विषय आला, तेव्हा मी आणि उद्धव दोघेही कडाडलो. कारण कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे,” असे त्यांनी म्हटले.











