पुणे:- चित्रपटातील मराठी माणूस : जागतिक मराठी संमेलनात महेश मांजरेकरांनी बेधडक संवाद साधला आहे.दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी मराठी कला अकादमी, गोवा येथे २१ वे जागतिक मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
२१ व्या जागतिक मराठी संमेलनाच्या व्यासपीठावर ‘चित्रपटातील मराठी माणूस’ या विषयावरील सत्राने अत्यंत दमदार सुरुवात केली. या सत्रात ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची प्रख्यात चित्रपट समीक्षक ब्रिटिश नंदी यांनी घेतलेली मुलाखत विशेष आकर्षण ठरली.
या संवादात महेश मांजरेकर यांनी अभिनय, चित्रपटसृष्टी आणि बदलत्या काळातील माध्यमांवर स्पष्ट व परखड मत मांडले. “अभिनय शिकून येत नाही. मुळात तुमच्या अंगी असलेल्या अभिनयाला तुम्ही फक्त पॉलिश करू शकता,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “एआय भविष्यात सिनेमाला गिळून टाकेल,” त्यामुळे सर्जनशीलतेला अधिक महत्त्व देणे आवश्यक आहे. मराठी चित्रपटसृष्टीच्या भविष्यासंदर्भात त्यांनी मोठ्या बजेटचे, एकत्रित प्रयत्नांतून साकारलेले चित्रपट होणे गरजेचे असल्याचे नमूद केले.
मुंबईच्या प्रश्नांवर बोलताना त्यांनी स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की, “मुंबईचे प्रश्न जो सोडवेल, त्याच्यासोबत मी असेन.” तसेच सोशल मीडियामुळे अनेक नवे कलाकार पुढे आले असून, “सोशल मीडियाने चित्रपटसृष्टीपेक्षा अनेक कलाकार पुढे आणले आहेत, हे मान्यच करावे लागेल,” असेही त्यांनी अधोरेखित केले.या सत्रामुळे जागतिक मराठी संमेलनात चित्रपट, समाज आणि तंत्रज्ञान यांमधील नात्याविषयी सखोल आणि विचारप्रवर्तक चर्चा घडून आली.











