गावदेवी भाजी मंडईतील आगीच्या घटनेनंतर झालेल्या पालिका आयुक्त तसेच सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत १ जूनला भाजी मंडई खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, ही भाजी मंडई आता १ जूनला खुली होणार नसल्याचे सांगत ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी त्यामागेच कारणही स्पष्ट केले आहे.
गावदेवी भाजी मंडईत गेल्या आठवड्यात आग लागली. यात अग्निशमन विभागाचे स्थानक अधिकारी सागर शिंदे आणि पालिकेचे आरक्षक काळू गाडेकर यांचा मृत्यु झाला तर, दोन जण जखमी झाले होते. या घटनेनंतर पालिका आयुक्त सौरभ राव, महापौर शर्मिला पिपंळोलकर आणि सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली होती. यात १ जूनला गावदेवी मंडई खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु आता १ जूनला ही मंडई खुली होऊ शकणार नसल्याची माहिती महापौर पिंपळोलकर यांनी मंगळवारी दिली.
महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि अधिकारी यांनी गावदेवी भाजी मंडईबरोबरच पहिल्या मजल्यावर असलेल्या नौपाडा प्रभाग समिती कार्यालयाची पाहणी केली. हे कार्यालय सुस्थितीत करण्याच्या सूचना महापौरांनी यावेळी दिल्या. सद्यस्थितीत सर्व राडारोडा काढण्याचे व स्थापत्यसंलग्न कामे सुरू आहेत. महापालिकेची संपूर्ण यंत्रणा पूर्ण क्षमतेने साफसफाईचे आणि इतर संलग्न काम करीत असून सर्व गाळे सुस्थितीत करण्यासाठी आणखी काही दिवस लागणार असल्याचे महापौर पिंपळोलकर यांनी भाजी विक्रेत्यांशी संवाद साधताना सांगितले.
मृतांच्या कुटुंबियांची भेट गावदेवी आग दुर्घटनेत अग्निशमन विभागाचे स्थानक अधिकारी सागर शिंदे आणि आरक्षक काळू गाडेकर यांचा मृत्यु झाला. सागर यांच्या घरी जावून महापौरांनी त्यांच्या पत्नी माधुरी शिंदे आणि आई जयश्री शिंदे यांना महापालिकेच्या माध्यमातून १० लाखांच्या अर्थसहाय्याचा धनादेश सुपुर्द केला. तसेच सुरक्षारक्षक काळू गाडेकर यांच्या पत्नी पद्मा गाडेकर यांना सोमवारी महापालिकेत धनादेश सुपुर्द करण्यात आला. या घटनेत अग्निशमन विभागाचे तीन जवान जखमी झाले. समीर सदानंद जाधव, सुजीत रामचंद पष्टे आणि प्रशांत शाम मुल्ल्या या तिघांच्याही घरी जावून महापौरांनी त्यांची विचारपूस केली आणि त्यांना १ लाख रुपयांचा आर्थिक सहायचा धनादेश सुपुर्द केला.










