इराण-अमेरिका संघर्षामुळे जागतिक तेल बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली असताना भारतासमोरही इंधन पुरवठ्याचे संकट उभे राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत पश्चिम बंगालमधून एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे.
कोलकात्याजवळील अशोकनगर परिसरातून लवकरच कच्च्या तेलाचे उत्खनन सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोलकात्यापासून सुमारे 48 किलोमीटर अंतरावर असलेल्या अशोकनगर भागात सुमारे आठ वर्षांपूर्वी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूचे मोठे साठे आढळले होते. आता या क्षेत्रातून प्रत्यक्षात कच्चे तेल काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी हालचाली वेगाने सुरू झाल्याची चर्चा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी शनिवारी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीत पश्चिम बंगालच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली.
या चर्चेदरम्यान औद्योगिकीकरणाला चालना देणे आणि उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील अशोकनगर तेलक्षेत्रात उत्पादन सुरू करण्यासाठी तातडीने पावले उचलण्यावर विशेष भर देण्यात आला.
कोलकात्याजवळील अशोकनगर तेलक्षेत्र हे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू उत्खननासाठी महत्त्वाचे केंद्र मानले जात आहे. वर्ष 2018 मध्ये Oil and Natural Gas Corporation अर्थात ONGC ने या क्षेत्राचा शोध लावला होता.
पूर्व भारतातील हे पहिले तेल आणि वायू उत्पादन क्षेत्र मानले जाते. प्राथमिक अंदाजानुसार येथे 240 दशलक्ष बॅरलपेक्षा अधिक कच्च्या तेलाचा साठा असू शकतो.
अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अशोकनगर तेलक्षेत्राचे महत्त्व आणखी वाढले आहे. या क्षेत्रात यापूर्वी ड्रिलिंगचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र विधानसभा निवडणुकांपूर्वी काही स्थानिक वाद निर्माण झाल्याने हे काम थांबवण्यात आले होते.
एका सूत्राच्या माहितीनुसार आता राज्यात भाजपची सत्ता आल्यामुळे ONGC ला प्रकल्प पूर्ण करण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
राज्यसभा खासदार समिक भट्टाचार्य यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनार बांग्ला अर्थात सुवर्ण बंगाल घडवण्याचा संकल्प मांडला आहे. त्यासाठी भाजपकडे स्पष्ट दृष्टीकोन आणि विकास आराखडा असल्याचे त्यांनी म्हटले. पश्चिम बंगालमधील उद्योगधंदे जवळपास संपुष्टात आले असून राज्याच्या आर्थिक पुनरुत्थानासाठी केंद्र सरकारचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. निर्मला सीतारामन यांना बंगालच्या आर्थिक पुनर्बांधणीसाठी कोणत्या दिशा आवश्यक आहेत, याची पूर्ण जाणीव असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सीतारामन आणि भट्टाचार्य यांच्यातील बैठक राजकीयदृष्ट्याही महत्त्वाची मानली जात आहे. कारण याआधी गुरुवारी मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती.
या भेटीत बंगालशी संबंधित विविध प्रकल्प, विकास योजना आणि आर्थिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आल्याचे सांगितले जाते.
समिक भट्टाचार्य यांनी दावा केला की केंद्र सरकार आणि विविध केंद्रीय विभागांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे बंगाल पुन्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. सध्याच्या कठीण परिस्थितीतून बंगालला बाहेर काढून पुन्हा प्रगत राज्य बनवणे शक्य आहे आणि त्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल. त्यांच्या मते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे सर्व नेते मिळून बंगालला नव्या उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपने डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून बंगालमध्ये उद्योग, रोजगार आणि विकासाला चालना देण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेत आल्यानंतर राज्याच्या आर्थिक पुनरुत्थानासाठी केंद्र सरकारचे संपूर्ण सहकार्य आवश्यक असल्याची जाणीव भाजपला झाल्याचेही या चर्चांमधून स्पष्ट होत आहे.
अशोकनगर तेलक्षेत्रातून उत्पादन सुरू झाल्यास पश्चिम बंगालच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळू शकतो. त्याचबरोबर भारताच्या ऊर्जा सुरक्षेलाही काही प्रमाणात बळकटी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.










