ठाण्यातील लोकउपवन आणि प्रताप सिनेमा परिसरातील गृहसंकुले अनधिकृत फेरीवाल्यांच्या गराड्यात अडकली असून रहिवाशी हैराण होण्याबरोबरच त्यांची सुरक्षा धोक्यात आहेत. फेरीवाल्यांच्या व्यवसायात कोट्यवधींची हप्तेबाजी होत असल्यामुळेच प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप आमदार संजय केळकर यांनी केला असून पालिका, पोलीस आणि वाहतूक विभागाने संयुक्त मोहीम राबवून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
ठाणे येथील खोपट भागातील भाजपच्या कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात लोकउपवन आणि प्रताप सिनेमा परिसरातील गृहसंकुलांमधील रहिवाशांनी उपस्थित राहून आमदार केळकर यांच्याकडे तक्रार नोंदवली. लोक उपवन गृहसंकुलातील सुमारे ५०० रहिवाशांनी सह्यानिशी फेरीवाल्यांच्या जाचाबद्दल निवेदन दिले. गृहसंकुलाच्या प्रवेशद्वारासमोरच फेरीवाल्यांनी गराडा घातल्याने रहिवाशांना बाहेर पडणे मुश्किल झाल्याचे रहिवाशांनी निदर्शनास आणून दिले आहे. दुसरीकडे प्रताप सिनेमा परिसरातील पाच सोसायट्यांसाठी असलेला खाजगी रस्ता देखील अनधिकृत फेरीवाल्यांनी किरण कृत केल्याचे रहिवाशांनी सांगितले.
याच मुद्द्यावरून पत्रकारांशी बोलताना आमदार केळकर यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले. अनधिकृत फेरीवाल्यांच्या व्यवसायात कोट्यवधींची हप्तेबाजी होत असल्याने इतर शहरातील फेरीवालेही ठाण्यात बेकायदेशीरपणे व्यवसाय करत आहेत आणि संबंधित प्रशासनाकडूनही ठोस कारवाई होत नाही. या फेरीवाल्यांमुळे सामान्य नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे, असा आरोप त्यांनी केला. भविष्यात गावदेवी अग्नितांडवाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी पालिका, पोलीस आणि वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने मोहीम घेऊन कायमस्वरूपी आणि ठोस कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत, अशी माहिती केळकर यांनी दिली.
रेल्वेच्या विकास कामासाठी रेल्वे लगतची बांदल चाळ पाडण्यात येणार आहे, त्यामुळे ५० कुटुंबे बाधित होणार आहेत. या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी पुढील आठवड्यात महापालिका, रेल्वे प्रशासन आणि रहिवाशांची संयुक्त बैठक घेऊन ठोस नियोजन करण्यात येणार असल्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगितले.











