ते दोघे एकमेकांच्या प्रेमात बुडालेले, लग्नही करायचं, पण कुटुंबीयांचा नकार, अशी नेहमीची फिल्मी स्टोरी प्रत्येक प्रेमीयुगुलांसोबत घडते. पण, डोंबिवलीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
८ वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करणारे हे प्रेमवीर कुटुंबियांच्या विरोधात जाऊन कोर्ट मॅरेज करतात. नंतर कुटुंबीयांना कळतं. पण, दुसऱ्या दिवशी मुलीला घेऊन तिचे कुटुंबीय गायब झाल्याचा प्रकार आता समोर आला आहे. या प्रकरणी आता माझी बायको हरवली आहे, अशी तक्रारच या तरुणाने पोलीस स्टेशनमध्ये केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली इथं ही घटना घडली आहे. दोघेही डोंबिवली परिसरात राहणार आहे. या प्रकरणी पती ओमकार याने आपली पत्नी शिवानी ही हरवली असल्याची तक्रार डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल केली. ओमकार आणि शिवानीचं ८ वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होतं. त्याच प्रेमापोटी त्यांनी १५ मे रोजी कोर्ट मॅरेज केलं. शिवानीच्या घरच्यांना याबाबत काहीही माहिती नव्हती. याच दरम्यान शिवानीच्या घरच्यांनी तिच्यासाठी एक मुलगा पसंत केला. तो तिला पाहायला तिच्या घरी देखील आला होता, आणि त्याच मुलाला शिवानीने होकार द्यावा अशी जबरदस्ती ते शिवानी घरचे करत होते, मात्र शिवानीने त्याला नकार दिला.
पुढे शिवानी च्या घरच्यांना ओमकार आणि शिवानीने दोघांच्या कोर्ट मॅरेजबद्दल सांगितलं. त्यानंतर दोन दिवस शिवानी आपल्या पती ओमकारच्या घरी होती. त्यानंतर शिवानीचा मामा आला, त्याने ओमकारची भेट घेतली. “तुम्ही अशा प्रकारे पळून जाऊन लग्न केलं, कोर्ट मॅरेजही केलं. मग आता आपण तुमचं नातेवाईकांसमक्ष लग्न लावून देऊ”, असं सांगितलं. ओमकार आणि शिवानीचा आनंद गगनात मावेना असं झालं. मामांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून शिवानी आपल्या घरी परत गेली.
ओमकारच्या घरी लग्नाची तयारी सुरू झाली. २४ मे रोजी दोघांचं लग्न ठरवण्यत आलं होतं. लग्नासाठी हॉल देखील बुक करण्यात आला होता. मात्र, त्याच्या आदल्या रात्री शिवानीचे घरचे शिवानीला घेऊन गायब झाले. हे समजताच ओमकारने सगळीकडे शोध घेतला. पण, तिचा काही पत्ताच लागला नाही. त्यानंतर ओमकारने मानपाडा पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दाखल केली. “मी बौद्ध समाजाचा असल्याने माझ्या विषयी शिवानीच्या घराघरच्या मनात राग होता. त्यांनी मला मोबाईल फोनवरून अपशब्द देखील वापरले होते. त्यामुळे आता शिवानीच्या जीवाला धोका आहे. तिचा शोध घेण्यात यावा” अशी मागणी ओमकारने केली आहे. तर मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. या तरुणीचा शोध घेतला जात आहे.











