खड्ड्यामुळे नांदगावला रस्त्याची दुरवस्था रेल्वेगेट गंगाधरी बायपासच्या दुरुस्तीची मागणी सकाळ वृत्तसेवा बाणगाव बुद्रुक ता. १४ : नांदगाव शहरातील रेल्वे गेट ते गंगाधरी बायपास तसेच शनिमंदिर पूल-रेल्वे स्टेशन समोरील अत्यंत महत्त्वाच्या मुख्य रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट झाली आहे.
ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे त्रस्त नागरिक, वाहनचालकांनी पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. रस्त्यावरून तहसील कार्यालय, ग्रामीण रुग्णालय,पंचायत समिती, कृषी कार्यालय,कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच शासकीय आयटीआय महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांकडे रोज हजारो नागरिकांची ये-जा असते.मात्र रस्त्यावरील खड्डे,चिखल आणि साचलेले सांडपाणी यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, रस्त्यालगत सुरू असलेले सिमेंट गटार बांधकाम अनेक दिवसांपासून अपूर्णावस्थेत आहे.
परिणामी सांडपाणी थेट रस्त्यावर साचत असून रस्ता घसरडा झाला आहे.त्यामुळे दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग जीवघेणा ठरत आहे. रात्री वाहनचालकांना मोठा धोका निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. स्थानिक नागरिकांनी तसेच विविध संघटनांनी अनेकवेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या. शांतता समिती बैठकीतही मिरवणूक मार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्याची मागणी करण्यात आली होती.
मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. संतप्त नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देत तत्काळ रस्ता दुरुस्ती व गटारकाम पूर्ण करण्याची मागणी केली. अन्यथा गंगाधरी बायपास येथे उपोषण आंदोलनाचा इशारा दिला आहे. पावसाळ्यापूर्वी सिमेंट नाले व डांबरीकरणाची कामे पूर्ण होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
कोट बांधकाम विभाग निष्क्रिय बनल्याने नागरिकांच्या त्रासाशी त्यांना काहीही देणेघेणे राहिलेले नाही. आंदोलन टाळण्यासाठी खोटी आश्वासने देण्यात आली. मात्र अद्याप ना खड्डे बुजवले, ना गटारकाम पूर्ण झाले. पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण होणे गरजेचे आहे.










