कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ‘परवडणारी’ म्हणून ओळखली जाणारी दिवा-सावंतवाडी-दिवा एक्स्प्रेस सध्या प्रवाशांसाठी नरकयातना ठरत आहे. या गाडीने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना १२ तास केवळ शारीरिक कष्टच नाही, तर मानसिक छळही सहन करावा लागत आहे.
जागा मिळवण्यासाठी प्रवाशांना आदल्या रात्री १० वाजेपासून दिवा स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर मुक्काम करावा लागत आहे. ही गाडी सकाळी ६ वाजता सुटते.
शुक्रवारी (८ मे) रात्री दिवा स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक ७, ८ वर रात्री ८:१५ वाजता गाडी आली. रात्री १०:४५ वाजता तिचे दरवाजे उघडण्यात आले. प्रवाशांनी धक्काबुक्की करत प्रवेश करून जागा अडविली. ते तसेच बसून होते. मात्र पुढे १२ तास त्यांना अनेक यातना सहन करत प्रवास करावा लागला.
स्टेशनवरील पाणपोई बंद होती. नवीन शौचालय प्रवाशांसाठी खुले केलेले नाही. त्यामुळे महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय झाली. रात्रभर अंधारात प्रवासी गाडीत बसून होते. डब्यात ना पंखे सुरू होते, ना कुठून हवा येत होती. वर्षानुवर्षे अशीच स्थिती आहे.
आता प्लॅटफॉर्मवर लाईट तरी असतात, असे प्रवाशांनी सांगितले. पावसात प्रवासी आडोसा शोधून थांबायचे. सावंतवाडीपर्यंत जाताना सर्व स्टेशनवर थांबणारी ही एकमेव गाडी असल्याने ठाणे जिल्ह्यातील सामान्य प्रवाशांच्या सोयीची आणि परवडणारी आहे.
सावंतवाडी एक्स्प्रेसने जाताना आणि परतीसाठी तेथून दिव्याला येताना संपूर्ण दिवस गाडीतच जातो, तरीही तिला हजारो प्रवाशांची पसंतीची आहे. पहाटे पहिल्या लोकलपासून येणाऱ्या प्रवाशांची गाडीत गर्दी होते. ती निघेपर्यंत डब्यांत पाय ठेवायलाही जागा राहत नाही.
अनेक वर्षांपासून असाच खडतर प्रवास करत आहोत. कोकणात जाणारे बहुतांश प्रवासी ठाणे जिल्ह्यात राहतात. त्यासाठी दिव्यातून जास्तीत जास्त रेल्वे सोडायला हव्यात, पण कोणी ऐकत नाही.










