काशिमीरा येथे शॉपिंग मॉल उभारण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुरुस्तीच्या नावाखाली हटवण्याचा निर्णय मिरा-भाईंदरच्या सत्ताधारी भाजपने घेतल्याचा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे.या आरोपामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिरा-भाईंदर शहरातील काशिमीरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुरुस्तीसाठी काढण्याचा ठराव नुकताच महापालिकेच्या महासभेत मंजूर करण्यात आला आहे. मात्र प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावात पुतळ्याची दुरुस्ती करून त्यानंतर स्थलांतर करण्याचा उल्लेख असल्याने, दुरुस्तीच्या नावाखाली पुतळा कायमस्वरूपी हटवण्याचा डाव असल्याचा आरोप शिवप्रेमींनी केला आहे. त्यामुळे शहरातील वातावरण तापले आहे.
दरम्यान, हा पुतळा मॉल उभारण्यासाठी हटवला जात असल्याचा दावा प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत केला. या संदर्भात २०१७ मध्ये महापालिकेने निर्णय घेतला होता. घोडबंदर येथे नवीन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना, दोन किलोमीटर अंतरावरील जुना पुतळा हटवण्यात येईल, असे शपथपत्र महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचा दावा त्यांनी केला.
यात पुतळ्याच्या दुरुस्ती व स्थलांतराचा ठराव महासभेत मंजूर होत असतानाच, पुतळ्याच्या दोन्ही बाजूंना महापालिकेच्या मालकीच्या जागेवर शॉपिंग मॉल उभारण्याचाही ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे सत्तेच्या आडून भाजप आमदार नरेंद्र मेहता आर्थिक फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. आणि हे आरोप नसून उपलब्ध कागदपत्रे आहेत.”मंत्री म्हणून नव्हे, तर शिवप्रेमी म्हणून हा पुतळा हटवू देणार नाही,”अशी ठाम भूमिका सरनाईक यांनी मांडली.
दरम्यान, भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत, पुतळा केवळ दुरुस्तीसाठी तात्पुरता हटवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.











