मध्य प्रदेशातील जबलपूर येथील बरगी डॅममध्ये क्रूझचा अपघात झाला अन् या दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला तर 28 जणांना वाचवण्यात यश आलं. या अपघात बोट चालक महेश पटेल बचावले. अपघाताच्या वेळी नेमकं काय घडलं, याचा घटनाक्रम त्यांनी सांगितलं आहे.
या सर्व प्रकारामुळे मला तीन दिवसांपासून झोप येत नसल्याचंही महेश पटेल म्हणाले आहेत.
महेश पटेल यांनी सांगितले की, “जेव्हा मी डॅमच्या किनाऱ्यावरून क्रूझ घेऊन निघालो होतो, तेव्हा हवामान अगदी सामान्य होते. वादळाचे कोणतेही संकेत नव्हते, फक्त मंद वारा वाहत होता. मात्र, परतीच्या प्रवासावेळी अचानक वाऱ्याचा वेग वाढला. परिस्थितीचा अंदाज घेऊन मी सर्व प्रवाशांना लाईफ जॅकेट दिले होते. मात्र, वाऱ्याचा वेग प्रचंड असल्यामुळे बोट किनाऱ्याला लावणे कठीण झाले होते.” असं पटेल म्हणाले.
पटेल पुढे म्हणाले, “आम्ही बोट किनाऱ्याला सुरक्षितपणे उभी करण्यासाठी नांगर टाकण्याचा प्रयत्न केला, पण जोरदार वाऱ्यामुळे यश आले नाही. काही क्षणातच बोटीत पाणी शिरू लागले. आम्ही किनाऱ्यापासून अवघ्या 50-60 मीटर अंतरावर होतो, पण तेवढ्यात बोट उलटली. मी सर्वांना लाईफ जॅकेट दिले होते, पण काही लोक बोटीवर नाचण्यात मग्न होते आणि त्यांनी सूचना देऊनही लाईफ जॅकेट घातले नव्हते. जर सर्वांनी जॅकेट घातले असते, तर कदाचित परिस्थिती वेगळी असती.” असा दावा महेश पटेल यांनी केला आहे.
या अपघाताच्या धक्क्यातून महेश पटेल अजूनही सावरलेले नाहीत. “गेल्या तीन दिवसांपासून माझ्या डोळ्यासमोरून तो प्रसंग जात नाहीये. मला झोप येत नाहीये आणि मी काहीही खाल्लेले नाही. या घटनेचा मला प्रचंड पश्चाताप होत आहे. अशी वेळ कुणावरही येऊ नये, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो,” असे भावूक उद्गार त्यांनी काढले. तसेच बोटीच्या देखभालीबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, क्रूझची नियमित देखभाल दर सोमवारी केली जात असे. तसेच, अपघाताच्या दिवशी हवामान खात्याकडून कोणताही इशारा किंवा सूचना त्यांना मिळाली नव्हती. बोट कशालाही धडकली नसून केवळ निसर्गामुळे हा अपघात झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.











