पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात रविवारी एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली आहे. सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या तरुणांवर काळाने झडप घातली आहे.
जाधववाडी धरणात सेल्फी घेण्याच्या नादात भोसरीतील तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेने संपूर्ण मावळ तालुका हादरला आहे. तसेच, याच दिवशी पवना नदीतही एका तरुणाचा बळी गेला आहे. अशा प्रकारे मावळमध्ये एकाच दिवसात पाण्यात बुडून चार जणांचा मृत्यू झाल्याने मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजय गारुडे, अनिकेत पवार आणि संतोष येडके अशी मृत तरुणांची नावे आहेत. हे तिघेही पिंपरी-चिंचवडमधील भोसरी येथील रहिवासी होते. ते भोसरी एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत कामाला होते. मूळचे परभणीचे असलेले हे तरुण रविवारी मित्रांसोबत मावळमध्ये फिरण्यासाठी गेले होते. दुपारी तीनच्या सुमारास हे सर्वजण जाधववाडी धरण परिसरात पोहोचले. उन्हाचा कडाका असल्याने त्यांनी पाण्यात उतरून पोहण्याचा निर्णय घेतला.
सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू असताना, या तरुणांनी पाण्यात उभे राहून सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढत असताना सेल्फी काढणारा तरुण अचानक खोल खड्ड्यात घसरला. त्याला वाचवण्यासाठी गेलेले इतर दोन मित्रही पाण्याच्या ओढीत खेचले गेले. काही क्षणातच हे तिघेही डोळ्यादेखत खोल पाण्यात बुडाले. इतर मित्रांनी आरडाओरड केल्यानंतर स्थानिकांनी आणि बचाव पथकाने तिथे धाव घेतली. मावळ वन्यजीव रक्षक आणि शिवदुर्ग संस्थेच्या पथकाने बराच वेळ शोधमोहीम राबवून तिघांचेही मृतदेह बाहेर काढले.
दरम्यान, याच दिवशी पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या मनोज भारत गौतम या तरुणाचाही बुडून मृत्यू झाला. उन्हाळ्यामुळे सध्या नद्या आणि धरणांवर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, पाण्याचा आणि तळाच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने असे जीवघेणे अपघात घडत आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना वारंवार आवाहन करण्यात येत आहे की, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणे टाळावे. या घटनेमुळे भोसरी परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.











