वसई तालुक्यातील अनेक नागरिकांची जमीन मोजणीची प्रकरणे तांत्रिक अडचणी आणि प्रशासकीय विलंबामुळे दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत. याचा मोठा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी पुढाकार घेत जनसंवाद उपक्रम सुरू केला आहे.
सध्या वसई विरार जमिनीचा वापर अधिकच वाढला आहे. त्यामुळे जागा निश्चित करणे, जागेचा आराखडा तयार करणे अशी विविध प्रकारच्या कामासाठी भूमी अभिलेख विभागाकडे अर्ज केले जात आहेत. मात्र मागील काही महिन्यांपासून अनेकांची जमीन मोजणीची कामे प्रलंबित राहू लागली आहे. त्यामुळे नागरिकांना ही सतत भूमीअभिलेख विभागात फेऱ्या माराव्या लागत आहेत.
यात भूमीअभिलेख विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील जमीन मोजणीच्या कामात गती आणणे आणि नागरिकांच्या तक्रारींचे थेट निवारण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.ज्या नागरिकांची जमीन मोजणीची प्रकरणे प्रलंबित आहेत त्यांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
यातून मार्ग निघावा यासाठी व नागरिकांची रखडलेली कामे मार्गी लागावी यासाठी वसईच्या आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी भूमी अभिलेख विभागाच्या सहकार्याने येत्या ३० एप्रिल २०२६ रोजी एका विशेष ‘जनसंवाद’ दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते दुपारी दोन या वेळेत हा उपक्रम घेण्यात येणार आहे.











