पुणे, २३ एप्रिलः” सर्वसमावेशक विकासाचे चालक म्हणून ग्रामीण उद्योजकता आणि आरोग्य-तंत्रज्ञान हे दोन महत्वाचे स्तंभ आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देऊन गरीबी निर्मूलन आणि ग्रामीण शहरी दरी कमी करण्यास मदत करतात. या दोन्हींचा संगम ग्रामीण भारताला स्वावलंबी आणि शाश्वत विकासाच्या मार्गावर घेऊन जात आहे.” असे विचार महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीचे सीईओ डॉ. श्रीकांत पाटील यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ कॉम्प्युटर सायन्स अॅड इंजिनिअरिंग आणि स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी तसेच कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज पुणे आणि इंन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी पुणे यांच्या सहयोगाने आयोजित ‘इंडस्ट्री ५.०साठी प्रतिभावंतांना सक्षम करणे’ या संकल्पनेखाली इंडस्ट्री अकॅडेमिया कॉन्क्लेव्ह २०२६चे आयोजन करण्यात आले. याच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
या कार्यक्रमाला एमआयटी डब्ल्यूपीयू चे कार्याध्यक्ष डाॅ. राहुल विश्वनाथ कराड यांचे मार्गदर्शन लाभले.
या परिषदेत ‘इंजिनिअरिंग लीडरशिप २०२७’ आणि ‘भारताची डीप टेक परिसंस्था उभारणे’ या विषयांवर दोन अत्यंत महत्वपूर्ण चर्चासत्रे झाली. यामध्ये १० हून अधिक तज्ज्ञ सहभागी झाले होते.
उद्घाटन प्रसंगी एचएफसीएल ग्रुप चे संरक्षण विभागाचे कार्यकारी अध्यक्ष आणि बिझनेस युनिट प्रमुख संपतकुमारन एस टी, संचेती हॉस्पिटल च्या संचालक रुपा संचेती व एलअँडटी टेक सर्व्हिसेसचे सीओओ मृत्यंजय सिंग हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, सीईओ डॉ. प्रसाद खांडेकर, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे अधिष्ठाता डॉ. सिद्धार्थ चक्रवर्ती उपस्थित होते.
संपतकुमारन एस टी म्हणाले,” संरक्षण आणि दळणवळण तंत्रज्ञानातील स्वदेशी नवोन्मेषन महत्वाचे आहे. याच्या प्रत्यक्ष वापरासाठी योग्य आणि वास्तविक उपाययोजना विकसित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स, दळणवळण प्रणाली, डेटा विश्लेषण आणि एआय यांना एकत्रित करण्यार्या आंतरविद्याशाखीय क्षमतांची गरज आहे.”
रुपल संचेती म्हणाल्या,”भारतातील आरोग्यसेवेच्या उपलब्धतेत खूप मोठ्या प्रमाणात आव्हाने आहेत. तसेच उपलब्ध रुग्णालयांची संख्या अल्प आहे. त्यासाठी विस्तारक्षम, डेटा आधारित उपायांच्या गरजेवर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच एआय हे दर्जेदार आरोग्यसेवेची उपलब्धता लक्षणीयरीत्या वाढवू शकते. भविष्यातील कार्य हे कल्याण, लवचिकता आणि विश्वास यावर आधारित असावे.”
डॉ. आर.एम.चिटणीस म्हणाले,” शैक्षणिक उत्कृष्टता, मूल्ये आणि सामाजिक प्रभाव यांचा मेळ घालणार्या सर्वांगीण शिक्षणाप्रती विद्यापीठाचे कार्य महत्वाचे आहे. इंडस्ट्री ५.० च्या युगात व्यापक हितासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करु शकणार्या जबाबदार, नैतिक, अभियंत्यांना घडविणे गरजेचे आहे.”
मृत्यंजय सिंग यांनी उद्योगांचे भविष्य घडविण्यासाठी अभियांत्रिकी डिजिटल तंत्रज्ञान आणि एआय यांच्या संगमावर भर दिला. एमआटी डब्ल्यूपीयूचे मुख्य शैक्षणिक अधिकारी डॉ. प्रसाद खांडेकर यांनी ही संवाद साधला.
डॉ. सिद्धार्थ चक्रवर्ती यांनी स्वागतपर भाषणात नवोन्मेष, अनुभवात्मक शिक्षण आणि तंत्रज्ञानाशी सुसंगत असे कौशल्यपूर्ण मनुष्यबळ तयार करण्यासाठी उद्योग शैक्षणिक सहकार्याच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला.
सहयोगी अधिष्ठाता डॉ.सुखदा भिंगारकर यांनी आभार मानले.











