रेल्वे संरक्षण दलाच्या (आरपीएफ) नागपूर विभागाने २०२५-२६ या कालावधीत ‘नन्हे फरिश्ते’ या विशेष मोहिमेंतर्गत आतापर्यंत एकूण ८८ अल्पवयीन मुलांची सुरक्षित सुटका केली आहे.
ही मोहीम केवळ रेल्वेपरिसरातील बालसुरक्षेसाठी मर्यादित नसून, मानवी संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचे प्रभावी उदाहरण ठरत आहे. नागपूर रेल्वेचे विभागीय सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांच्या मार्गदर्शनात ऑपरेशन ‘मुस्कान’ अंतर्गत रेल्वे संरक्षण दल सातत्याने दक्षतेने कार्यरत आहे. या मोहिमेद्वारे घरातून पळून गेलेली, हरवलेली किंवा कुटुंबापासून विभक्त झालेली मुले रेल्वे गाड्या, स्थानके आणि परिसरात आढळल्यास त्यांची ओळख पटवून त्यांना मानवी तस्करी, शोषण व इतर संभाव्य धोक्यांपासून संरक्षण दिले जाते. २०२५ या वर्षात ‘नन्हे फरिश्ते’ मोहिमेत एकूण ८० अल्पवयीन मुलांची सुटका करण्यात आली.
यामध्ये ५० मुलगे आणि ३० मुलींचा समावेश आहे. तर २०२६ मध्ये आतापर्यंत ८ अल्पवयीन मुलांना सुरक्षित ताब्यात घेण्यात आले आहे. प्रत्येक प्रकरणात रेल्वे संरक्षण दलाने तातडीने कारवाई करत मुलांना चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांच्या हातात पडण्यापासून वाचवले आहे. सुटका करण्यात आलेल्या सर्व मुलांची माहिती ‘ट्रॅक चाइल्ड’ पोर्टलवर नोंदविण्यात येते. त्यानंतर नियमानुसार संबंधित जिल्हा बालकल्याण समितीकडे त्यांना सुपूर्द केले जाते. आवश्यक तपासणी आणि पडताळणीनंतर संबंधित मुलांना त्यांच्या पालकांकडे किंवा नातेवाईकांकडे सुरक्षितरित्या सोपविण्यात येते. आग्नेय मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे हे प्रयत्न केवळ बचावकार्यापुरते मर्यादित नसून, हरवलेल्या व घरातून पळून जाणाऱ्या मुलांच्या समस्येबाबत समाजात जनजागृती करण्याचेही काम करत आहेत. ‘नन्हे फरिश्ते’ ही मोहीम अनेक असुरक्षित मुलांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरत आहे.
पालक, प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन
रेल्वे संरक्षण दलाने नागरिक व प्रवाशांना आवाहन केले आहे की, रेल्वे गाडी, स्थानक किंवा परिसरात कोणताही अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी कुटुंबापासून वेगळा, घरातून पळून गेलेला किंवा संशयास्पद परिस्थितीत आढळल्यास तत्काळ रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ), सरकारी रेल्वे पोलिस (जीआरपी), संबंधित रेल्वे कर्मचारी किंवा जवळच्या आरपीएफ जीआरपी ठाण्याशी संपर्क साधावा. समाजाच्या सहकायनिच अशा मोहिमा अधिक प्रभावी ठरू शकतात, असेही आवाहन करण्यात आले आहे.











