वाढदिवस हा आनंद, उत्साह आणि नव्या आशांचा दिवस मानला जातो. मात्र बिहारच्या सारण जिल्ह्यातील अमनौर परिसरात एका १४ वर्षीय मुलीने आपल्या वाढदिवसादिवशीच आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. वाढदिवसानिमित्त आनंद साजरा करण्याऐवजी घरात शोककळा पसरली असून, या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.
खुशबू शर्मा असे या दुर्दैवी मुलीचे नाव असून ती इयत्ता आठवीत शिकत होती. खुशबू ही तीन बहिणी आणि एका भावामध्ये सर्वात मोठी होती. अभ्यासात हुशार, समजूतदार आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळणारी म्हणून तिची ओळख होती.
वाढदिवसासाठी मेहंदी काढली, पण…
वाढदिवस असल्याने खुशबूने हातावर मेहंदी काढली होती. घरात लहान भावंडांसोबत ती नेहमीप्रमाणे वावरत होती. तिच्या चेहऱ्यावरून ती इतके टोकाचे पाऊल उचलेल, याची कल्पनाही कोणालाच आली नव्हती.
वर्षभरापूर्वी आईचे निधन, जबाबदारी मुलीवर
खुशबूच्या आईचे वर्षभरापूर्वी आजारपणामुळे निधन झाले होते. त्यानंतर घरातील लहान भावंडांची काळजी, घरकाम आणि अभ्यास यांचा ताण नकळतपणे तिच्या खांद्यावर आला होता. वडील हिरालाल शर्मा हे व्यवसायाने प्लंबर असून कामानिमित्त अनेकदा घराबाहेर असत.
घटनेच्या दिवशीही वडील शेजारच्या गावात कामासाठी गेले होते. घरात लहान मुले खेळत असतानाच शेजाऱ्यांना अचानक खुशबूच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. संशय येताच शेजाऱ्यांनी धाव घेऊन तिला खाली उतरवले आणि तातडीने पोलिसांना माहिती दिली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता.
मोबाईल फोडल्याचा राग कारणीभूत?
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आत्महत्येच्या एक दिवस आधी कोणत्यातरी कारणावरून खुशबूचा मोबाईल फोन तोडण्यात आला होता. यावरून तिला रागावले देखील गेले होते. या घटनेमुळे झालेला मानसिक तणाव किंवा घरातील परिस्थितीमुळे आलेले दडपण यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
पोलीस तपास सुरू, शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा
घटनेची माहिती मिळताच अमनौर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि एफएसएल (फॉरेन्सिक सायन्स लॅब) पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन छपरा सदर रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.
‘मुलीच्या गळ्यावर खुणा आढळल्या आहेत. मात्र आत्महत्येचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल,’ असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या या प्रकरणाचा सर्व अंगांनी तपास सुरू आहे.
वडिलांचा टाहो, परिसर हळहळला
मुलीचा मृतदेह पाहताच वडिलांनी फोडलेला टाहो उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेणारा होता. वाढदिवसाच्या दिवशीच लेकीचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.











