वाशी – गोजवाडा, ता. वाशी शिवारातील एका फटाका कारखान्यात शुक्रवार (ता. सहा) सकाळी साडे आठच्या सुमारास अचानक स्फोट होऊन परिसरात खळबळ उडाली. स्फोटाची तीव्रता मोठी असल्याने कारखान्याचे पत्र्याचे शेड पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, स्फोटानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गोजवाडा शिवारातील गट क्रमांक ५६१ मध्ये असलेल्या ‘बालाजी फायर वर्क्स’ या फटाका कारखान्यात फटाक्यांच्या निर्मितीसाठी ठेवण्यात आलेल्या कच्च्या मालाच्या ठिकाणी स्फोट झाला. घटनास्थळी ४० किलोपेक्षा अधिक मिक्स केलेली दारू आढळून आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या कारखान्यात कोणीही जखमी अथवा मयत नसल्याचा जबाब परवानाधारकांच्या वडिलांनी दिला आहे.
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार प्रकाश म्हेत्रे यांच्यासह वाशी पोलिसांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन पाहणी केली. पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, सदर कारखान्याकडे आवश्यक परवाने होते का, तसेच सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यात आले होते का, याबाबत चौकशी सुरू आहे.
दरम्यान, स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. औद्योगिक सुरक्षा संचालनालयाचे उपसंचालक व त्यांच्या पथकाकडून घटनास्थळी सविस्तर चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार प्रकाश म्हेत्रे यांनी दिली.
फटाका कारखान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
तेरखेडा परिसरात मोठ्या प्रमाणावर फटाका कारखाने असून, या उद्योगामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मात्र, कारखान्यांमध्ये सातत्याने होणाऱ्या स्फोटांच्या घटनांमुळे सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. मागील शनिवारी तेरखेडा परिसरातील एका फटाका कारखान्यात स्फोट झाला होता. त्यानंतर अवघ्या आठवड्याच्या आत गोजवाडा परिसरात पुन्हा स्फोटाची घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
अल्पावधीत घडलेल्या या दोन दुर्घटनांमुळे फटाका कारखान्यांतील सुरक्षाव्यवस्था पुरेशी आहे का, याबाबत चर्चा सुरू झाली असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.











