राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली एक्झिटनंतर पक्षासह उपमुख्यमंत्रिपदाची धुरा कोणाच्या खांद्यावर सोपवली जाणार आणि दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार की नाही, याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी पक्ष आणि पवार कुटुंबात वेगवान हालचाली सुरू असून बारामतीत पवार कुटुंबाची बैठक सुरू आहे. शरद पवारांच्या नेतृत्वात गोविंद बाग या निवासस्थानी होत असलेल्या या बैठकीला सुरुवातीला खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार, राजेंद्र पवार हे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. त्यानंतर आता काही वेळापूर्वी पार्थ पवार हेदेखील या बैठकीसाठी गोविंद बागेत पोहोचले आहेत.
सुनेत्रा पवार या शरद पवार किंवा पवार कुटुंबातील इतर सदस्यांसोबत राजकीय चर्चा न करता मुंबईत आल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे पवार कुटुंबात राजकीय मतभेद अजूनही कायम आहेत की काय, याबाबतच्या चर्चांनीही जोर धरला होता. या पार्श्वभूमीवर पार्थ पवार हे गोविंद बागेत पोहोचल्याने कुटुंबातील दोन्ही गटांत पुन्हा एकदा संवाद प्रस्थापित होत असल्याचं दिसत आहे.
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत काय निर्णय होणार?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, यासाठी दिवंगत अजित पवार हे अत्यंत आग्रही होते. तसे संकतेही त्यांनी दिलं होतं. तसंच अजित पवार यांच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत या अनुषंगाने अनेक बैठकाही झाल्या होत्या. परंतु अजित पवारांचं अकाली निधन झाल्याने या प्रस्तावाचं पुढे काय होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यातच सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसाठी मुंबईत पोहोचल्याने विलिनीकरणाला खिळ बसणार का, अशी चर्चा रंगत होती. परंतु आता पार्थ पवार हे शरद पवारांसह कुटुंबातील इतर सदस्यांसोबत चर्चा करण्यासाठी गेल्याने यातून काही मध्यममार्ग निघणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शरद पवार शपथविधीबद्दल काय म्हणाले?
‘सुनेत्रा पवार या आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, याबाबत मला कल्पना नाही. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे या लोकांनी तो निर्णय घेतला असावा. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे’, असं शरद पवारांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे.











