सातारा जिल्हा परिषदेतील प्रशासकीय अधिकारी असलेल्या सुनील विठ्ठल रांजणे (रा. तामजाईनगर, करंजे, ता. सातारा) याने तलाठी पदावर भरती लावून देण्याचे आमिष दाखवून सहा जणांची तब्बल 1 कोटी 2 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी विठ्ठल प्रल्हाद रामदासी (वय 64, रा. सिंहगड, पुणे) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, ही फसवणूक जानेवारी 2024 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीनुसार, तक्रारदार यांच्या शाळेच्या मान्यतेसंबंधी कामानिमित्त संशयित सुनील रांजणे याच्याशी ओळख झाली. या ओळखीचा फायदा घेत रांजणे याने आपणास विविध खात्यांमध्ये ओळखी असल्याचे सांगत, तलाठी पदासाठी थेट भरती करून देतो, असे आश्वासन दिले. भरतीसाठी प्रत्येकी 10 लाख रुपये खर्च येईल, असे सांगून तक्रारदारांचा विश्वास संपादन केला.
त्यावर विश्वास ठेवून तक्रारदारांनी त्यांच्या ओळखीतील दोन उमेदवारांसाठी साताऱ्यात रोख 20 लाख रुपये संशयिताकडे दिले. मात्र, ठरलेल्या कालावधीत नोकरी न लागता संशयिताने वारंवार टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर चौकशी केली असता, रांजणे याने अशाच प्रकारे आणखी काही जणांचीही फसवणूक केल्याचे समोर आले.
यानंतर सर्व बाबींची खातरजमा करून तक्रारदारांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तपासात एकूण सहा जणांकडून 1 कोटी 2 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी या प्रकरणी फसवणूक, विश्वासघात आणि सरकारी पदाचा गैरवापर या कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. संशयिताने आणखी किती जणांची फसवणूक केली आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.











