महाराष्ट्राचं उमदं नेतृत्व, महाराष्ट्राच्या लढवय्या नेता आज हरपला आहे. संपूर्ण महाराष्ट्र आज शोकसागरात बुडाला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज विमान अपघातात निधन झालं आहे. ही घटना कुणालाही पचनी पडणारी नाही. ही बातमी खोटी ठरावी, असं प्रत्येकाला वाटत आहे. पण या वास्तवाला सामोरं जाण्याशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही. प्रचंड शिस्तप्रिय असणारे अजित पवार हे आज सकाळी मुंबईहून बारामतीत जात होते. त्यांचं विमान बारामती विमानतळावर लँड होण्याआधीच तीन किमी अंतरावर असणाऱ्या माळरानावर कोसळलं. या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील पाच जणांचा मृत्यू झाला.
अजित पवार यांच्या निधनाचं वृत्त समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना अश्रू अनावर झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे अत्यंत दु:खी झाले आहेत. घटना घडली तेव्हा युगेंद्र पवार वगळता संपूर्ण कुटुंब दिल्लीत होतं. घटनेनंतर पवार कुटुंब बारामतीत दाखल झालं. खासदार सुप्रिया सुळे यांनी घटनेनंतर सर्व उद्ध्वस्त झालं, अशा आशयाचं व्हाट्सअप स्टेटस ठेवलं. तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घटनास्थळी जावून घटनेचा आढावा घेतला.
या घटनेनंतर अजित पवार यांचं पार्थिव बारामती शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं. रुग्णालयाबाहेर हजारो कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमा झाली आहे. कार्यकर्ते ढसाढसा रडताना दिसत आहेत. पवार कुटुंबातील सर्व सदस्य इथे दाखल झाले आहेत. पोलिसांकडून गर्दी आवरण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पण राज्यभरातून लाखो कार्यकर्ते, नेते बारामतीत दाखल होत आहेत. अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठा जनसागर लोटलेला बघयला मिळत आहे. कार्यकर्त्यांचं प्रेम आणि लोकप्रियता मोठी असल्यामुळे अजित पवार यांचं पार्थिव आता बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
विद्या प्रतिष्ठानचे ट्रस्टी किरण गुजर यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. “स्वर्गीय अजित दादांचं पार्थ आज दुपारी चार वाजेपासून रात्री उशिरापर्यंत विद्या प्रतिष्ठान विद्यानगरी चौक या ठिकाणी तेथील मैदानात नागरिकांना अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर उद्या सकाळी 9 वाजता गदिमा सभागृहापासून अजित दादा यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा निघेल. ही अंत्ययात्रा गदिमा सभागृह विद्यानगरी चौक, बिघून रोड सेवा रस्ता विद्या प्रतिष्ठानचा रस्ता, मराठी शाळेच्या गेटने विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात जाईल. सकाळी अकरा वाजता विज्या प्रतिष्ठानच्या मैदानावर होईल”, अशी माहिती विद्या प्रतिष्ठानचे ट्रस्टी किरण गुजर यांनी दिली आहे.











