पुणे : ” महापुरूष व संत हे जातीचे नव्हे तर देशाचे असतात. ज्ञानेश्वरी पासून बुद्धांच्या तत्वांचा अभ्यास करणारे विद्वान आचार्य रतनलाल सोनग्रा हे बहुआयामी, बहुभाषी, बहुज्ञानी व्यक्तीमत्वाचे धनी होते. त्यांनी पंचशील ते पसायदानाचे नाते जोडले. ते जाती धर्माच्या पलिकडचे होते. महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरी चळवळीत त्यांचे मोलाचे योगदान आहे. भारतीय संविधानाला शोभेल असे त्यांचे कुटुंब आहे. त्यांच्या जाण्याने साहित्य क्षेत्राला खूप मोठी हानी झाली आहे.” अशी भावना श्रद्धांजली सभेत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व माईर्स एमआयटी शिक्षण संस्था, समूहातर्फे कोथरुड येथील डब्ल्यूपीयूच्या ज्ञानेश्वर हॉलमध्ये आचार्य प्रा. रतनलाल सोनग्रा यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिण्यात आली.
या वेळी मराठी साहित्य सम्मेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या सहित राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारीता जगतातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याच प्रमाणे आचार्य प्रा. सोनग्रा यांच्या पंच कन्या व त्यांच्या संपूर्ण परिवार उपस्थित होता.
उल्हास पवार म्हणाले,” प्रा. सोनग्रा म्हणजे वैचारिक मेजवाणी असायची. त्यांच्यात वैचारिक ताकत होती. बहुआयामी, बहुभाषी, बहुज्ञानी व्यक्तिमत्वाचे ते धनी होते. त्यांनी आपल्या लेखनीतून शोषित समाजाचे दुःख आणि संघर्ष मांडला आहे. त्यांच्या साहित्यात कादंबरी, कथासंग्रह आणि कवितांचा समावेश होतो. त्यांचे साहित्य हे सर्वस्पर्शी होते.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,”अतिशय निर्मळ व प्रांजळ व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्याकडे पहावे लागेल. चेहर्यावर सदैव हास्य ठेवून ते आयुष्य जगले. अचानक त्यांच्या जाण्याने माझी आणि संस्थेची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.”
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले,” जाती धर्माच्या पलिकडील या व्यक्तिने ज्ञानेश्वरीपासून भगवान गौतम बुद्धांच्या तत्वांचा खरा अभ्यास केला आहे. त्यांनी आपल्या लेखनीतून प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचा रोष आणि समतेची अपेक्षा मांडली.”
त्यानंतर लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, एकनाथ गायकवाड, सरकार निंबाळकर, विलास तांदळे, प्रेमसुख सोनग्रा, भगवान वैराट, आरती सोनग्रा, भारती सोनग्रा, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, डॉ. संजय उपाध्ये व डॉ. महेश थोरवे यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना आचार्य रतनलाल सोनग्रा यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
या वेळी माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहचे कुलसचिव डॉ. रत्नदीप जोशी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आचार्य प्रा. रतनलाल सोनग्रा यांच्या प्रतिमेला पुष्पाअर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.











