मुंबई:- पनवेल महापालिका निवडणुकीत प्रचार शिगेला पोहोचला आहे. दररोज मोठमोठे नेते प्रचारासाठी पनवेलमध्ये उपस्थित राहात आहेत. मात्र, नागरिकांच्या समस्यांवर कोण बोलताना दिसून येत नाही. सर्वच उमेदवार प्रचारात व्यस्त असताना प्राथमिक समस्यांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. त्या सोडविण्याकडे कार्यकर्त्यांना वेळ नाही. त्यामुळे तुमच्या राजकारणात आमचे मुद्दे गेले कुठे? आम्हाला स्मार्ट सिटी नको, आम्हाला भेडसावणाऱ्या समस्या सोडवा, अशी आर्त हाक नागरिक राजकारण्यांना देत आहेत.
महापालिकेने भव्य स्टेडियम उभारून वेंगसरकर क्रिकेट अकादमीमार्फत सीजन बॉल क्रिकेटला व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. मात्र, याच अकादमीला लागून असलेल्या राजीव गांधी मैदानाची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी तरुण क्रिकेट तसेच अँथलेटिकचा नियमित सराव व व्यायाम करीत असतात. एकीकडे भव्यदिव्य क्रिकेट अकादमी आणि दुसरीकडे बकाल मैदान अशी स्थिती पाहायला मिळते.
आदई तलावाने काय बिघडवले? त्याचे डबके केले
नवीन पनवेलमधील आदई तलाव हे शहरातील मुख्य आकर्षक आहे. मात्र, अनेक वर्षापासून तलावाचे सुशोभीकरण कागदावरच आहे. तलावात सर्रास कचरा टाकला जातो. सुरक्षा कठडा नसल्याने अपघाताची शक्यता आहे. महापालिकेने आदई तलावाचे सुशोभीकरण करण्याची मागणी होत आहे. शहरातील अन्य तलाव तसेच आजूबाजूच्या परिसरावे सुशोभीकरण करण्यात आले असताना, आदई तलाव मात्र दुर्लक्षित राहिला आहे.
होल्डिंग पाँडची करून टाकली कचराकुंडी
शहरात काही ठिकाणी होल्डिंग पॉण्ड तयार करण्यात आले आहेत. नवीन पनवेल सेक्टर ९ येथील होल्डिंग पॉण्ड सध्या कचऱ्याचे आगर बनले आहे. या ठिकाणी देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने कचऱ्याचे डम्पिंग ग्राऊंड बनले आहे. पनवेल महापालिकेमार्फत या ठिकाणी सूचना फलक लावण्याची मागणी नागरिक करीत आहेत. तसेच अशाप्रकारे उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
बस चकाचक, पण बस स्थानकाची अवस्था दयनीय
एनएमएमटीच्या नवीन पनवेलमधील बस स्थानकाची दुरवस्था झाली असून, मोडकळीस आल्याने एखाद्या खंडरसारखे भासते. या ठिकाणी टाकण्यात आलेली माती रस्त्यावर पसरत असून, अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे. प्रवाशांची गैरसोय होत असल्याने पावसाळ्यात प्रवाशांचे हाल होतात.











