पुणे:- महापालिका मतदानासाठी काहीच दिवस शिल्लक असताना पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. एकमेकांवर आरोप करताना चित्रपट आणि वेब सिरीजचाही दाखला दिला जात आहे. आमदार रोहित पवारांनीही अजितदादांचं कौतुक करताना त्यांना केजीएफ चित्रपटातील ‘रॉकी भाई’ म्हटलं. पिंपरीतील दोन गरुडा म्हणजे दोन्ही भाजप आमदारांचा भ्रष्टाचार संपवण्यासाठी अजितदादा रॉकी भाई प्रमाणे काम करतील असं रोहित पवार म्हणाले. पिंपरी चिंचवडमधील महापालिकेच्या प्रचारसभेत रोहित पवार बोलत होते.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
रोहित पवार म्हणाले की, “KGF चित्रपटामध्ये जसं एक गरुडा आहे तो सर्व मायनिंगवर ज्या प्रकारे आपलं नियंत्रण ठेवतो तसं या शहरातील दोन गरुडा हे सगळीकडे आपलं नियंत्रण ठेवत आहेत. ते प्रत्येक टेंडरमध्ये रिंग करतात आमि पैसे खातात. या दोन्ही गरुडांना असं वाटतं हे सामान्य लोकांचा साम्राज्य नाही, त्यांचं साम्राज्य आहे. त्यावेळी रॉकी हा हिरो सर्वसामान्य जनतेला जसं गुंडागर्दीच्या दहशतीतून बाहेर काढतो, अगदी त्या प्रकारे अजित पवार हे देखील रॉकीप्रमाणे या शहराला आणि जनतेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढतील.”भाजपने शहरवासीयांना चुना लावलाय. कुत्र्यांची नसबंदी, टीव्ही खरेदी सर्वात भ्रष्टाचार केला. केजीएफमधील गरुडा पाहिलाय का? पिंपरी चिंचवडमध्ये एक दाढीवाला गरुडा अन् दुसरा बिन दाढीवाला गरुडा आहे. या दोन्ही गरुडांनी पालिका लुटली. केजीएफमध्ये जशी रॉकीने गरुडाची मक्तेदारी संपवली, तशी शहरातील दोन गरुडांची मक्तेदारी संपवायची आहे. यासाठी आपले रॉकी म्हणजे अजितदादा आहेत असं रोहित पवार म्हणाले.
महेश लांडगे भ्रष्टाचाराने बरबटलेला बोका
महेश लांडगेंनी अजित पवारांवर केलेल्या आरोपांवर बोलताना रोहित पवार म्हणाले की, “महेश लांडगे हे या शहरातला भ्रष्टाचाराने बरबटलेला बोका आहे अस स्थानिक लोक म्हणतात स्थानिक लोकं जे बोलतात त्याला ते जास्त महत्त्वाचं आहे. महेश लांडगे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकात भ्रष्टाचार केला. पिंपरीतील कचऱ्यात आणि पिण्याच्या पाण्याच्या टँकरमध्ये देखील त्यांनी भ्रष्टाचार केला.”
भाजपाला सत्तेपासून थांबवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र याव अशी आमच्या पक्षाची दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा होती त्यामुळे आम्ही महापालिका निवडणुकीत एकत्र आलो आहोत असं रोहित पवारांनी स्पष्ट केलं. हिंदू संस्कृतीमध्ये पवार एकत्र असणं याला खूप महत्त्व आहे. दोन्ही परिवार एकत्र रहावे ही माझी देखील इच्छा आहे. मात्र राजकारणात सर्व गोष्टी साध्य होत नाहीत असंही ते म्हणाले.











