नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) विविध भरती प्रक्रियांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कागदपत्र पडताळणी प्रक्रियेत महत्त्वाचे बदल केले आहेत. आता उमेदवारांना ऑनलाईन अर्जासोबत प्रमाणपत्रे आणि आवश्यक कागदपत्रे ‘डिजिलॉकर’ प्रणालीद्वारे सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे कागदपत्रांची पडताळणी अधिक जलद, पारदर्शक आणि सुरक्षित पद्धतीने होणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
आतापर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करताना विविध प्रमाणपत्रे स्वतंत्रपणे अपलोड करावी लागत होती. त्यानंतर आयोगाकडून त्या कागदपत्रांची छाननी करून उमेदवारांची पात्रता निश्चित केली जात होती. मात्र, या प्रक्रियेला पर्याय म्हणून केंद्र शासनाने विकसित केलेल्या ‘डिजिलॉकर’ प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
एमपीएससीने दिलेल्या माहितीनुसार, ज्या उमेदवारांचे डिजिलॉकरवर आधीपासून खाते आहे, त्यांनी त्यांच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीतील खात्यामधून ‘मेरी पेहचान’ पोर्टलवर लॉगीन करून डिजिलॉकर खात्याला संमती द्यायची आहे. त्यामुळे उमेदवारांचे डिजिलॉकर खाते आणि एमपीएससीची ऑनलाईन अर्ज प्रणाली एकमेकांशी जोडली जाईल.
ज्या उमेदवारांचे डिजिलॉकरवर खाते नाही, त्यांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नवीन खाते उघडणे आवश्यक आहे. आधार क्रमांक किंवा आधारशी संलग्न मोबाईल क्रमांकाच्या मदतीने खाते तयार करता येणार आहे. त्यानंतर हे खाते एमपीएससीच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीशी लिंक करावे लागणार आहे.
डिजिलॉकरमध्ये लॉगीन केल्यानंतर उमेदवारांना ‘जारी केलेली कागदपत्रे’ या विभागात विविध सरकारी संस्था, शैक्षणिक मंडळे, विद्यापीठे आणि अधिकृत विभागांकडून जारी करण्यात आलेली कागदपत्रे उपलब्ध होतील. यात आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, दहावी-बारावीची गुणपत्रके, प्रमाणपत्रे यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे समाविष्ट असतील.
तसेच, डिजिलॉकरमध्ये उपलब्ध नसलेली कागदपत्रे जसे की अनुभव प्रमाणपत्र किंवा इतर आवश्यक कागदपत्रे उमेदवारांना पीडीएफ स्वरूपात ‘ड्राईव्ह’ विभागात अपलोड करता येणार आहेत. ऑनलाईन अर्ज भरताना कागदपत्रे अपलोड करण्याच्या टप्प्यावर उमेदवारांनी ‘डिजिलॉकर’चा पर्याय निवडून संबंधित कागदपत्रे शेअर करणे आवश्यक राहील.
एमपीएससीने स्पष्ट केले आहे की, अर्ज प्रक्रियेदरम्यान लॉगीन करताना किंवा प्रमाणपत्रे अपलोड करताना उमेदवारांना डिजिलॉकर खात्यातील कागदपत्रे शेअर करण्यासाठी संमती द्यावी लागेल. एकदा दिलेली ही संमती पुढील ३० दिवसांसाठी वैध राहणार आहे.
याशिवाय आयोगाने आणखी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. भविष्यात भरती प्रक्रियेचा अंतिम निकाल लागल्यानंतर शिफारसपात्र उमेदवारांना शिफारसपत्रेही डिजिलॉकर प्रणालीद्वारेच उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना कागदपत्रांच्या भौतिक प्रती घेऊन वारंवार कार्यालयात जाण्याची गरज कमी होणार आहे.
डिजिलॉकर प्रणालीच्या वापराबाबत सविस्तर सूचना आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सध्या ही सुविधा वैकल्पिक स्वरूपात लागू करण्यात आली असली, तरी भविष्यात कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे केवळ डिजिलॉकर प्रणालीद्वारेच स्वीकारली जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
माहिती तंत्रज्ञान नियम २०१६ नुसार डिजिलॉकरमधील जारी केलेल्या कागदपत्रांना मूळ भौतिक प्रमाणपत्रांइतकीच कायदेशीर वैधता आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांनी डिजिलॉकर प्रणालीचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन एमपीएससीकडून करण्यात आले आहे.
एमपीएससीच्या या निर्णयामुळे भरती प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि कागदविरहित होण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे.
Post Views: 7











