एकीकडे सगळे महाराष्ट्र दिन साजरा करत असताना पुण्यातील नसरापूरमध्ये एका साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. 65 वर्षाच्या व्यक्तीला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला असताना आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला 20 वर्षापूर्वीच त्याच्या मुळगावातून हकललं होतं, अशी माहिती समोर आली आहे. 20 वर्षापूर्वीच आरोपी भीमराव कांबळे याच्यावर गावबंदी लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
आरोपी भीमराव कांबळे हा मुळचा भोरच्या साळवडे गावचा होता. आरोपीवर 1998 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये विनयभंगाचे दोन गुन्हे होते. त्यानंतर देखील त्याने गावातील अनेक महिलांना टार्गेट केलं अन् त्याच्यासोबत आक्षेपार्ह वर्तवणूक केली होती. त्यामुळे अख्खं गाव त्याच्यावर भडकलं होतं. एवढंच काय तर आरोपीने कोंबड्या, बकऱ्यांना देखील सोडलं नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी एकमताने निर्णय घेऊन त्याच्यावर गावबंदी घातली होती. त्याला गावाबाहेर काढण्यात आलं होतं.
गावाबाहेर काढल्यानंतर त्याला पोटापाण्यासाठी वेठबिगारी काम करावं लागलं. त्यावर त्याचा उदरनिर्वाह चालत होता. पण त्याचं कृत्य काही थांबत नव्हतं. त्यानंतर 2015 मध्ये देखील त्याच्यावर पुन्हा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर मागील दोन तीन वर्षापूर्वी त्याची पत्नी आणि मुलगा साळवडे गावात परतले होते. अशातच आता नराधमाच्या कुटूंबाला पुन्हा गावाबाहेर काढण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. पण चिमुकलीचा जेव्हा शोध सुरू होता, तेव्हा आरोपी शोधकार्यात होता, अशी माहिती समोर आली आहे.
मुलीचा आजी जेव्हा तिला शोधायला लागली. तेव्हा गावकऱ्यांनी तिला शोधण्यात मदत केली. सर्व ठिकाणी शोधाशोध सुरू झाली. तेव्हा अनेक लोकांच्या घोळक्यात आरोपी मिक्स झाला अन् शोधण्याचं नाटक करू लागला. पण जेव्हा सीसीटीव्हीमध्ये आरोपी दिसला त्यानंतर त्याची गावकऱ्यांनी चौकशी केली. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. आरोपीवर संशय बळावल्यावर त्याची पोलिसांनी कसून चौकशी केली, त्यानंतर त्याने आपला गुन्हा मान्य केला.
दरम्यान, आरोपीकडे मुलीची विचारणा केली असता त्यानं काहीही सांगितलं नाही. त्यानंतर गावकऱ्यांनी त्याला चोप दिल्यावर त्याने झालेली घटना सांगितली अन् मुलीचा मृतदेह कुठं लपवला याची माहिती दिली. आपण मृतदेह शेणात लपवल्याचं त्यानं सांगितलं अन् संपूर्ण गावकऱ्यांना धक्काच बसला. संध्याकाळी पार्थिव बाहेर काढल्यानंतर ग्रामस्थांचा राग अधिकच वाढला आणि त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर मोठं आंदोलन केलं. तोपर्यंत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं होतं.











