राज्य सरकारच्या आदेशानुसार पुणे जिल्हा परिषदेने शाळांचा दर्जा वाढविण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आतापर्यंत आठवीपर्यंत शिक्षण देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता १०पर्यंतचे शिक्षण मिळणार आहे.
उच्च प्राथमिक शाळांना नववी आणि दहावीचे वर्ग जोडण्यास मान्यता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये विद्यार्थी संख्या, स्थानिक गरज, पायाभूत सुविधा यांचा सखोल आढावा घेतला जाईल. त्याच्या आवश्यकतेनुसार हा विस्तार करण्यात आला आहे. निवडक जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना नैसर्गिक वाढीने पाचवी ते आठवी तसेच उच्च प्राथमिक शाळांना नववी आणि दहावीचे वर्ग जोडण्यास परवानगी देण्यात आलीय.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गावातील विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने पहिली ते बारावीपर्यंतचे मोफतगुणवत्तापूर्ण शिक्षण देता यावे, असा या उपक्रमाचा उद्देश आहे. २०२५ आणि आतापर्यंत १९ शाळांना पाचवीचा वर्ग, पाच शाळांना सहावीचा वर्ग तसेच १२ शाळांना आठवीचा वर्ग आणि चार शाळांमध्ये इयत्ता नववी आणि दहावीचा वर्ग सुरू करण्यात आलेत.
२०२६या वर्षात खेड, इंदापूर, दौंड, मावळ, मुळशी आणि भोर या तालुक्यांतील १६ शाळांना वाढीव इयत्तांचे वर्ग जोडण्यात आलेत. त्यात सर्वाधिक खेड तालुक्यातील शाळांचा समावेश आहे. २०२५मध्ये २४ शाळांमध्ये पाचवी ते आठवीचे वर्ग जोडण्यात आले. यात खेड, मावळ, दौंड, हवेली, शिरूर, बारामती, इंदापूर, मुळशी या ठिकाणच्या शाळांना पाचवी ते आठवी तसेच नववी आणि दहावीचे वर्ग जोडण्यात आलेत.
पुढे भविष्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या स्थानिक गरज आणि पायाभूत सुविधांचे सर्वेक्षण केले जाईल. शाळांच्या आवश्यकतेनुसार पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये बारावीपर्यंतची स्वयंपूर्ण शिक्षण व्यवस्था उभी करण्याच्या दृष्टीने हा ठोस टप्पा आहे.











