विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीच्या शेवटच्या दिवशी मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. माजी मंत्री व प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी गुरुवारी (ता.30) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
त्यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. पण आता बच्चू कडूंच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंच्या नेत्याकडून कडूंवर पहिला जिव्हारी लागणारा वार करण्यात आला आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंच्या धनुष्यबाण हाती घेताच पहिली तिखट प्रतिक्रिया दिली आहे.राऊत म्हणाले,’माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का? कष्टाने वाढवलेला माझा पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन करायला मी मूर्ख आहे का? आता कोण मूर्ख आहे ते पाहावे लागेल,अर्थात ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत,तो त्यांचा निर्णय असल्याचं रोखठोक विधान केलं होतं.
तसेच बच्चू कडू हे उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते,त्यांना मंत्रिपद दिलं होतं अशी खोचक आठवणही संजय राऊत यांनी यावेळी करुन दिली. ते म्हणाले, ठीक आहे, तो त्यांचा प्रश्न आहे. पण एका आमदारकीसाठी तुम्ही असा निर्णय घेत आहात,याचा अर्थ तुम्ही विधानसभेला निवडून यायची तुमची क्षमता आता संपली असल्याचा हल्लाबोलही राऊतांनी यावेळी केला.
शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांनी जेव्हा त्यांची विधान परिषदेतून निवृत्ती झाली, तेव्हाच त्यांची मला आता पुन्हा विधिमंडळात यायचं नाही ही भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी त्याचवेळी पहिलंच मन बनवलं होतं की,त्यांना लढायचं नाही,असंही दावा राऊतांनी यावेळी केला.
उद्धव ठाकरेंसाठी आमदारकी ही काय हे कधीच ‘ब्रेड अँड बटर’नाही.त्यांना मुख्यमंत्री पदासाठी सगळ्यांनी आग्रह केला म्हणून त्यांना आमदार व्हावं लागलं आणि आता त्यांनी त्या आमदारकीचा त्याग केल्याचंही राऊतांनी म्हटलं आहे.
संजय राऊतांनी यावेळी अंबादास दानवे हे शिवसेनेचे म्हणजेच महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि त्यांना जेवढी मतं आहेत, तेवढीही मिळतील असा विश्वास बोलून दाखवला होता. एकच जागा द्यायची होती. त्या जागेसाठी उद्धव ठाकरेंनी दानवेंची निवड केल्याचंही म्हटलं.
तसेच त्यांनी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे नाराज असल्याची चर्चाही फेटाळून लावल्या. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुषमा अंधारे या कडवट शिवसैनिक असल्याचं स्पष्ट केलं आहे.
शिवसेना ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या भूमिकेकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर भाजप तसेच शिवसेनेकडून अतिरिक्त उमेदवार देण्यात न आल्यानं ही निवडणूक आता बिनविरोध होणार आहे. अंबादास दानवे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.











