मुंबई अंडरवर्ल्डमधील एकेकाळचे कट्टर विरोधक समजले जाणारे अरुण गवळी उर्फ ‘डॅडी’ आणि जयेंद्र विष्णू ठाकूर उर्फ ‘भाई ठाकूर’ पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
कारण-विरारमध्ये झालेली त्यांची अनपेक्षित गळाभेट! या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय आणि गुन्हेगारी वर्तुळात चर्चांना अक्षरशः उधाण आलं आहे.
विरार येथील भाई ठाकूर यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. या वेळी दोघांनी गळाभेट घेत जुने आठवणींना उजाळा दिला. विशेष म्हणजे, भाई ठाकूर यांनी डॅडींना मैत्रीच्या प्रतीक म्हणून श्रीगणेशाची आकर्षक मूर्ती भेट दिली.
या भेटीदरम्यान काढलेला एक फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला. एकेकाळी वैर असलेल्या या दोन व्यक्तींना एकत्र पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
डॅडी म्हणजेच अरुण गवळी हा तब्बल १७ वर्षांनंतर सप्टेंबर २०२५ मध्ये कारागृहातून बाहेर आला आहे.दरम्यानच्या काळात डॅडी कारागृहात असताना त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई गवळी (८५) यांचे भायखळा येथे निधन झाले होते. त्याच्या अनुपस्थितीत त्यांच्या आई लक्ष्मीबाई गवळी यांचे निधन झाले होते. त्यावेळी सांत्वनासाठी भाई ठाकूर यांनी भायखळा येथे जाऊन भेट घेतली होती.
त्यावेळेस काही दिवस बहुधा धार्मिक विधीसाठी पे्रॉल वर बाहेर आलेल्या डॅडीच्या सांत्वनासाठी भाई ठाकूर यांनी डॅडीची भायखळा येथील घरी भेट घेतली होती. त्यावेळेस भाई ठाकूर यांनी डॅडीला विरार येथे येण्याचं निमंत्रण दिलं होते.
त्यासाठी काही दिवसापूर्वी डॅडीने थेट विरार गाठून भाई ठाकूर यांच्या विरार निवासस्थानी ही सदिच्छा भेट घेत आपले वचन पूर्ण करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यामुळे ही भेट केवळ मैत्रीची वचनपूर्ती आहे की त्यामागे काही वेगळे कारण आहे, याबाबत चर्चा रंगल्या आहेत.
या भेटीमागे व्यावसायिक किंवा इतर काही कारण असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे वसई-विरार तसेच मुंबईकरांमध्ये उत्सुकता आहे.











