शहरातील जटवाडा परिसरात शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने चारा वाहून नेणाऱ्या एका ट्रकने (क्र. एमएच ०४ सीए ४७२७) अचानक पेट घेतला.
चाऱ्याने क्षणात पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र, ट्रकचालकाने वेळीच प्रसंगावधान राखत जळणारा चारा ट्रकपासून वेगळा केला आणि ट्रक वस्तीपासून दूर मोकळ्या मैदानात नेऊन उभा केला, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, चालकाने मोंढ्यातून ट्रकमध्ये चारा भरला होता. हा चारा जटवाड्यातील हरणे नामक शेतकऱ्याकडे पोहोचवायचा होता. ट्रकमध्ये चारा प्रमाणापेक्षा जास्त भरलेला असल्याने जटवाडा रस्त्यावरील एचपी पंपासमोर ट्रक आल्यावर वरून गेलेल्या उच्च दाबाच्या विजेच्या तारांना चाऱ्याचा स्पर्श झाला. यामुळे चाऱ्याने अचानक पेट घेतला. रस्त्यावरील नागरिकांच्या लक्षात ही बाब येताच मोठा गोंधळ उडाला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे ड्युटी अधिकारी आर. आर. सोनवणे, जवान समीर शेख, रवी हरणे, रामेश्वर बमणे आणि शंकर दुधे यांनी तातडीने बंबासह घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. ट्रकचालकाच्या सतर्कतेमुळे ट्रकचे मोठे नुकसान टळले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.











