रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील अमराठी रिक्षा आणि टॅक्सीचालक संतापले आहेत. आज शिवसेना नेते संजय निरुपम यांनी दहिसर येथील गणपत पाटील नगरमध्ये मराठी भाषेच्या कडक सक्तीबाबत ऑटोचालकांशी संवाद साधला.
यावेळी मनसेचे नेते नयन कदम आणि कुणाल मईणकर कार्यकर्त्यांसोबत येथे पोहोचले होते. यावेळी मनसेकडून घोषणाबाजीही करण्यात आली. तसेच संजय निरुपम यांनी मराठीला विरोध केला तर त्यांना धडा शिकवला जाईल असं विधान केले. यानंतर संजय निरुपम यांनी काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
मुंबईतील दहिसरमध्ये बोलताना संजय निरुपम यांनी म्हटले की, आमच्या पक्षाची आणि एकनाथ शिंदे यांची सुरूवातीपासून ही भूमिका आहे की, महाराष्ट्रात जे लोक राहतात, त्यांनी मराठीत बोललं पाहिजे, याबाबत कुणाला शंका नाही. महाराष्ट्रात मराठीचा सन्मान व्हायला पाहिजे याबाबतही कुणाचा आक्षेप नाही. मात्र मराठी भाषेच्या नावाखाली जोर जबरदस्ती करणे, गुंडगिरी करणे, सक्ती करणे, एखाद्याला धमकावणे हे चुकीचं आहे आणि आमचा याला विरोध आहे.
महाराष्ट्र सरकारच्या नवीन जीआरचा जो मुद्दा आहे, तो जीआर आजचा नाहीये, तो 2019 चा आहे. त्यावेळी असा जीआर आला होता की ऑटोवाले आणि टॅक्सी चालवणारे जे लोक आहेत त्यांनी मराठीत बोलायला हवं. अशा मागणी असणे चुकीचे नाहीये, मात्र यासाठी आपल्याला ऑटो आणि टॅक्सी चालकांना थोडा वेळ द्यावा लागेल. त्यांना मराठी शिकण्याची संधी द्यावी लागेल. खुप असे चालक आहेत जे मराठी भाषेत बोलतात, मात्र काहींना मराठी बोलता येत नाही. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जो जीआर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे त्याची सर्वांना मराठी यायला हवी ही एक बाजू चांगली आहे.
पुढे रिक्षा चालकांना आवाहन करताना निरुपम यांनी म्हटले की, तुम्हाला मोडक्या तोडक्या भाषेत त्यांच्याशी संवाद साधायला यायला हवा. मात्र जीआर मध्ये म्हटले आहे, एक मे नंतर रिक्षा चालकांची टेस्ट होईल. यात ते नापास झाले तर त्यांचे परमिट रद्द करण्याबाबत भाष्य करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांचा धंदा बंद पडू शकतो. त्यामुळे मी सरनाईक यांनी पत्र लिहून याबाबत कळविले आहे की हे चुकीच आहे. त्यामुळे या निर्णयाचा पुनर्विचार करावा. दरम्यान, यानंतर संजय निरूपम यांचा कारवर मनसेकडून दगडफेक झाल्याचीही माहिती समोर आली आहे. यानंतर पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.










