युवा शेतकरी संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष माननीय रोहिदास उर्फ बापूसाहेब चोरघे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले युवा शेतकरी संघाचे आपत्कालीन पथक गेल्या एक वर्षापासून सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय आहे. संकटग्रस्तांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेल्या या पथकाने आज पुन्हा एकदा मानवतेचा आदर्श निर्माण केला आहे.
आज घडलेल्या घटनेत एका वृद्ध आजोबांचा सुमारे ५० फूट खोल दरीत पडून गंभीर अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच माननीय रोहिदास उर्फ बापूसाहेब चोरघे हे स्वतः तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली युवा शेतकरी संघाच्या आपत्कालीन पथकाने कोणताही विलंब न करता धाडसी बचावकार्य सुरू केले.
अत्यंत कठीण परिस्थितीत आणि जीव धोक्यात घालून आजोबांना दरीतून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे आजोबांचे प्राण वाचले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
या बचावकार्यात माननीय रोहिदास उर्फ बापूसाहेब चोरघे यांच्यासह ज्ञानेश्वर चोरघे, गोरख चोरघे, चंद्रकांत मोरे, कुणाल डोंबे आणि अनुज खोपडे यांनी सामाजिक बांधिलकी जपत सक्रिय सहभाग घेतला.
तसेच या संपूर्ण कार्यात पोलीस बांधव, महाराष्ट्र शासनाची १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका, तसेच ॲम्बुलन्समधील डॉक्टर व चालक यांनी अतिशय तत्परतेने, समन्वयाने व जबाबदारीने सहकार्य केले.
युवा शेतकरी संघाचे आपत्कालीन पथक केवळ शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी सदैव सज्ज असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. समाजासाठी झटणाऱ्या या सर्व समाजसेवकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत असून, मानवतेच्या रक्षणासाठी पुढे सरसावणाऱ्या प्रत्येक हाताला सलाम आणि मानाचा मुजरा.











