उन्हाळाची चाहूल लागताच बाजारात उन्हाळी फळे येण्यास सुरुवात झाली आहे. यात गोड, आंबट चवीच्या द्राक्षांची जळगावच्या बाजारात मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. द्राक्षांचे भाव वाढीव असले, तरी ग्राहकांची मागणी वाढत असल्याची माहिती फळ विक्रेत्यांनी दिली.
आंबट-गोड रसाळ द्राक्षांचा हंगाम बहरात आला असून, जळगावच्या फळबाजारात देखील द्राक्षांची मागणी व आवक वाढलेली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर बसलेले फळ विक्रेते, फ्रूट गल्ली व बाजारात द्राक्ष विकणाऱ्यांची संख्या आता वाढू लागलेली आहे. सद्या द्राक्षांचे सद्या भाव जास्त असून, जशी आवक वाढेल, तसे भाव कमी होतील, असे विक्रेत्यांनी यावेळी सांगितले.
कॅप्सूल द्राक्ष अधिक
फळ बाजारात काळ्या हिरव्या व काळ्या द्राक्षांची आवक जास्त असून, यात कॅप्सूल द्राक्षांची अधिक आवक आहे. सोलापूर व नाशिक येथून या द्राक्षांची आवक होत आहे.
१०० ते १५० रुपये किलो द्राक्ष
शहरात विक्रेत्यांकडे हिरव्या व काळ्या द्राक्षे विक्रीस उपलब्ध आहे. हिरवे द्राक्ष १०० ते १५० रुपये किलो आहे. तर काळे द्राक्षे १८० रुपये किलोप्रमाणे बाजारात मिळत आहेत.
काळे द्राक्ष आरोग्यासाठी फायदेशीर
काळ्या द्राक्षांमध्ये अँटीऑक्सिडंट्स, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ए, तांबे, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कार्बोहायड्रेट आदी पोषक तत्त्वे असतात. त्यामुळे काळी द्राक्षे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यामुळे अशक्तपणा, रक्तदाब, हद्याचे आरोग्य सुधारणे, कर्करोगाशी लढण्यास शक्ती मिळते.
फळ बाजारात द्राक्षाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. सध्या खाण्यायोग्य द्राक्षे बाजारात दाखल झाली असून, या फळाला उन्हाचा पारा जसा वाढेल, तशी मागणीतही वाढ होत राहील. नाशिक, सोलापूर येथून द्राक्षांची आवक जळगावत होत आहे.











