पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. एआयसीसी जनरल सेक्रेटरी भूपेश बघेल यांनी शुक्रवारी ही घोषणा केली.
नवज्योत कौर सिद्धू यांनी आपण काँग्रेसचा राजीनामा दिला असल्याचा दावा सात दिवसांपूर्वीच केला होता. त्यानंतर त्यांना पक्षातून काढून टाकल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान बघेल यांनी केलेल्या घोषणेनंतर कौर यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्षरित्या हल्लाबोल केला आहे. ‘पप्पूने अखेर स्वत:च्या नावावर शिक्कामोर्तब केले,’ असे कौर म्हणाल्या आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना लक्ष्य करण्यासाठी त्यांचे विरोधक अनेकदा ‘पप्पू’ या शब्दाचा वापर करतात. कौर यांनी देखील हाच संदर्भ देत टीका केली आहे.
कौर या अजूनही काँग्रेसचा भाग आहेत का? असा प्रश्न बघेल यांना विचारण्यात आले होते. ज्यावर ते म्हणाले की, ‘त्यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले होते, पण आता त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे.’
८ डिसेंबर २०२५ रोजी काँग्रेसने नवज्योत कौर यांचे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व काढून घेतले होते. जो ५०० कोटी रूपयांची सूटकेस देतो, तो पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा होतो, असे विधान त्यांनी केले होते, त्यानंतर कौर यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर ३१ जानेवारी रोजी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपण काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले होते.
बघेल यांच्या घोषणेनंतर कौर यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर पोस्ट करत टीका केली आहे. कौर यांनी राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या की, ते एक असे नेते आहेत ज्यांना वाटते की फक्त तेच प्रामाणिक आणि ज्ञानी व्यक्ती आहेत, परंतु प्रत्यक्षात त्यांना परिस्थितीची जराही कल्पना नाही.
पुढे त्या असेही म्हणाल्या की गांधींसाठी काम करत असलेल्या त्यांच्या आतल्या गोटातील लोकांनी त्यांना वनवासात ठेवण्यात आणि स्वतः मात्र ऐषारामीच्या जीवनाचा आनंद घेण्यात यशस्वी झाले आहेत. तसेच त्यांनी (गांधींनी) कुठलाही निर्णय घेण्याच्या आधीच ते लोक तिकीटं विकतात, असा आरोपही त्यांनी केला आहे केला आहे.
‘ते एखाद्या आणीबाणीच्या प्रसंगी प्रतिसाद देण्यास सहा महिन्यांहून अधिक वेळ घेतात, तोपर्यंत नुकसान भरून न येण्यापलीकडे गेलेले असते. त्यांनी लोकांना स्वत:बरोबर जोडण्यापूर्वी त्यांच्या तथाकथित समर्थकांना विचारावे की, ते प्रामाणिक राहण्यास तयार आहेत का? ते खरोखरच प्रामाणिक राहून पंजाबसाठी काम करण्यास तयार आहेत का?’ असा प्रश्न कौर यांनी विचारला आहे.
गांधींचे खूपच कमी समर्थक निस्वार्थ सेवा करण्यास तयार असल्याचेही कौर म्हणाल्या. ‘त्याऐवजी ते त्यांचे खिसे भरण्यात व्यस्त आहेत कारण त्यांनाही माहिती आहे की ते पुन्हा (सत्तेत) परत येणार नाहीत.’
‘जर तुमच्यात हिंमत असेल तर त्यांना सध्याच्या सरकारविरोधात बोलण्यास सांगा आणि त्यांच्या फाईली उघड होण्यासाठी तयार राहा,’ असेही कौर म्हणाल्या.
२०१२ मध्ये भाजपाच्या तिकिटावर कौर या अमृतसर पूर्व येथून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्या एसएडी-भाजपा युती सरकारमध्ये मुख्य संसदीय सचिव राहिल्या होत्या.
कौर यांनी आपल्या पतीसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१७ मध्ये, त्यांच्या पतीने अमृतसर पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. २०१८ मध्ये, कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारच्या काळात, नवज्योत कौर यांची पंजाब वेअरहाउसिंग कॉर्पोरेशनच्या संचालक आणि अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.











