दोन दिवसापूर्वी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर गॅसचा टँकर पलटी झाल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे वाहनधारकांसह प्रवाशांना २२ तास मनस्ताप सहन करावा लागला होता.
या मार्गावरील वाहतूक कोंडी ही नेहमीची झाली आहे, यावर आता राज्य सरकारने तोडगा काढला आहे. दरम्यान, आता सरकार शिरुर-चाकण-तळेगाव-कर्जत या नव्या महामार्गाचा आराखडा तयार करणार आहे.
मुंबईला येणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.पुणे, कोल्हापूरसह मराठवाड्यातून येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. यामुळे आता मराठवाडा आणि अहिल्यानगरहून मुंबईकडे येणारी वाहने चाकण-तळेगावमार्गे लोणावळ्यातून एक्स्प्रेसवेवर येतात. या वाहनांमुळे खंडाळा घाटात कोंडी होते. या महामार्गावरील वाहतूक शिरुर-कर्जत मार्ग तयार झाल्यामुळे मराठवाड्यातून येणारी जड वाहतूक शिरुर-खेड मार्गे थेट कर्जतला पोहोचेल, यामुळे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक कोंडी कमी येऊ शकते. या नवीन महामार्ग आधुनिक चारपदरी मल्टिमोडल कॉरिडॉर विकसित केला जाणार आहे.
साडेबारा हजार कोटींची खर्च
या महामार्गाची लांबी १३५ किमी असणार आहे. या माहमार्गाच्या कामाचा पहिला टप्पा ६० किलोमीटरचा असणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ७५ किलोमीटरचे काम करण्याचे नियोजन सरकारचे आहे. या महामार्गावर ५ बोगदे, ६ पूल, ४८ लहान पूल बांधले जाणार आहेत. या महामार्गासाठी साडेबारा हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहेत. चाकण, तळेगाव आणि शिक्रापूर या औद्योगिक पट्ट्यातील जड वाहतुकीमुळे पिंपरी-चिंचवड आणि पुण्याच्या अंतर्गत कोंडीही कमी होणार आहे.











