लातूर जिल्ह्यामध्ये एका व्यक्तीने आपली 60 वर्षीय आई आणि बहिणीला त्यांच्या घरातीलच एका खोलीत कथितरीत्या डांबून ठेवले होते. पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने दोघींची सुटका करण्यात आले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार या मायलेकी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचं म्हटलं जातंय. मागील दोन वर्षांपासून त्यांना कैदेत ठेवण्यात आले होते,असा दावा सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय.
लातूरमध्ये आई-मुलीची अखेर सुटका
नातेवाइकांनी सांगितले की मंगळवारी ( 3 फेब्रुवारी) मुक्त करण्यात आलेल्या आई-मुलीला एका खोलीत बंद ठेवण्यात आले होते, कारण त्या शेजाऱ्यांवर दगडफेक करून त्यांना त्रास देत होत्या. लातूर शहरापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या पखरसांगवी गावाजवळील रत्नापूर नगर येथील ही धक्कादायक घटना आहे.
कशी करण्यात आली सुटका?
सामाजिक कार्यकर्ता व्यकंट पन्हाळे यांना आठ दिवसांपूर्वी याची माहिती मिळाली होती. माहितीची खात्री केल्यानंतर त्यांनी वंचित मुलांसाठी असलेल्या ‘माझं घर’ या आश्रयगृहाचे संस्थापक शरद झारे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर दोघांनी सोमवारी पोलीस अधीक्षक (एसपी) अमोल तांबे यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीची माहिती दिली. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी मानव तस्करी विरोधी कक्षाला (एएचटीसी) तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले.
सामाजिक कार्यकर्त्यांसोबत पोलिसांचे एक पथक सोमवारी घटनास्थळी पोहोचले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मायलेकींची सुटका करण्यात आली.











