अतिरिक्त फी घेणाऱ्या महाविद्यालयांवर होणार कारवाई; विद्यार्थ्यांना लाखो रुपये परत मिळणार**
छात्रभारती महाराष्ट्राच्या वतीने अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांकडून घेतली जाणारी अतिरिक्त फी तसेच महाराष्ट्र शासनाने ऑगस्ट महिन्यात राज्यातील अनेक महाविद्यालयांना दिलेले २०, ४० व ६० टक्के अनुदान यानुसार विद्यार्थ्यांना फी परत मिळावी, या मागणीसाठी शिक्षण संचालक व शिक्षण उपसंचालक यांच्या दालनासमोर आंदोलन करण्यात आले.
शासन निर्णय (GR) नुसार ज्या प्रमाणात महाविद्यालयांना अनुदान मिळाले आहे, त्या प्रमाणात प्रत्येक विद्यार्थ्याला फी परत देणे बंधनकारक आहे. मात्र अनेक महाविद्यालयांकडून अद्यापही विद्यार्थ्यांना फी परत करण्यात आलेली नसल्याने छात्रभारतीने हे आंदोलन छेडले.
या आंदोलनाची गंभीर दखल घेत शिक्षण संचालकांनी तत्काळ सर्व संबंधित महाविद्यालयांना पत्र पाठवून विद्यार्थ्यांची फी परत करण्याचे आदेश देण्यात येतील, असे आश्वासन दिले. तसेच नियमबाह्य पद्धतीने अतिरिक्त फी घेणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
यावेळी छात्रभारतीचे राज्याध्यक्ष अनिकेत घुले, राज्य संघटक विशाल शिंदे, राज्य सदस्य राहुल जराड, प्रफुल कांबळे, पुणे जिल्हाध्यक्ष सौरव शिंपी, नगर जिल्हाध्यक्ष गणेश पवार, जिल्हा सदस्य वैष्णवी कोळी, आदर्श कडवळे, साहिल गजलवार, संघर्ष पवार, साक्षी गायकवाड, संचित गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छात्रभारतीची खास ओळख
“लढाई – पढाई, साथ साथ”











