मराठी तरुणी एकता सावंत हिच्या खाद्यपदार्थ गाडीच्या उद्घाटनासाठी मनसे नेते अविनाश जाधव यांनी डोंबिवलीत उपस्थिती लावली. अनेक अडथळे, संघर्ष आणि प्रशासनाच्या उदासीनतेनंतर आज एकताची गाडी पुन्हा सुरू झाली असून, ही तिच्या मेहनतीची फलश्रुती आहे, असे जाधव यांनी यावेळी सांगितले.
डोंबिवली स्टेशन परिसरात एकता ही शोर्मा ची गाडी लावत होती. मात्र पालिका प्रशासनाकडून तिच्यावर कारवाई करण्यात आली होती. यावर तिने समाज माध्यमातून आपली व्यथा मांडत परप्रांतीय फेरीवाल्यांना अभय दिले जाते आणि मराठी मुलीला व्यवसाय करू दिला जातं नाही असे म्हणत मनसेकडे मदत मागितली होती. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निर्देशानुसार नेते अविनाश जाधव यांनी मुलीची भेट घेत तिला बिनधास्त व्यावसाय कर पालिकेशी राज ठाकरे बोलतील असे आश्वासन दिले होते.
यानंतर बुधवारी एकता हिने डोंबिवली स्टेशन परिसरात आपली गाडी सुरू केली. या गाडीचे उदघाट्न अविनाश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनविसेचे अध्यक्ष प्रतिक देशपांडे, राहूल कामत यासह मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना अविनाश जाधव म्हणाले,”मनसे सुरुवातीपासून एकता सावंतच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. बाहेरून येणारे लोक येथे व्यवसाय करत असतील, तर मराठी मुलगीही इथेच व्यवसाय करणार,” असा ठाम इशारा त्यांनी दिला.
रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाला प्रश्नावर भाष्य करताना जाधव म्हणाले, “१५० मीटर परिसरातून फेरीवाले हटवावेत, यासाठी मनसेने २०१७ साली आंदोलन उभारले होते. त्यासाठी रेल्वे प्रशासन, पोलीस ठाणे आणि न्यायालयाच्या पायऱ्या आम्ही झिजवल्या. आज २०२६ सुरू आहे, पण परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.” जर त्याचे “न्यायालयाला काही देणेघेणे नाही, पोलिसांना काही पडलेले नाही आणि रेल्वे प्रशासनही ढिम्म आहे. बाहेरून येऊन लोक इथे व्यवसाय करत असतील तर मराठी मुलंही येथे व्यवसाय करणार. नियम सगळ्यांसाठी सारखे असतील, तर इतर फेरीवाले इथे कसे बसतात? ज्या दिवशी पोलीस खाते नियमाने वागेल, त्या दिवशी आम्हीही नियमाने वागू,” असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.
केडीएमसी प्रशासनावर थेट बोट दाखवत जाधव म्हणाले, “कारवाई करायचीच असेल, तर २०१७ साली दिलेल्या आमच्या पहिल्या पत्रावर त्यांनी ९ वर्षांत काहीच का केले नाही, याचे उत्तर आधी प्रशासनाला द्यावे लागेल.”
मराठी तरुण-तरुणींच्या व्यवसायावर अन्याय होऊ देणार नाही, आणि एकता सारख्या मराठी उद्योजकांच्या पाठीशी मनसे खंबीरपणे उभी राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.











