सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तेजीने व्हायरल होत आहे. एक व्यक्ती जेल बाहेर उभी आहे आणि मुलाचे गळे पडून रडत आहे.. तर या व्हिडिओमागे भावुक करणारे कारण आहे. सप्टेंबर २००० मध्ये फक्त २३ वर्षांचा असताना आग्र्याच्या ललितपूर जिल्ह्यातील एका खोट्या बलात्काराच्या आरोपाखाली विश्नू तिवारी यांना अटक झाली.
ग्रामीण भागातील एका महिलेच्या तक्रारीवरून त्यांच्यावर बलात्कार आणि sc/st कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला.
पुरावे कमकुवत, साक्षीदारांच्या जबाबात विरोधाभास आणि वैद्यकीय अहवालात तफावत असूनही २००३ मध्ये न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आग्रा सेंट्रल जेलमध्ये त्यांनी दोन दशके घालवले.
या काळात त्यांचे आई,वडील आणि भाऊ यांचे निधन झाले. पण अंत्यसंस्काराला उपस्थित राहता आले नाही, लग्न करता आले नाही, कुटुंब बनवता आले नाही. जीवनाचे सर्वात मौल्यवान वर्षे तुरुंगाच्या चार भिंतीत व्यतीत झाले. जगाबाहेरचे जग बदलले पण विश्नूंचे आयुष्य थांबले.
२०१९ मध्ये आग्रा जेल प्रशासनाने इलाहाबाद उच्च न्यायालयाकडे विनंती केल्यावर वकील श्वेता सिंह राणा यांना त्यांचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी मिळाली. त्यांनी केसची सखोल तपासणी केली. पुराव्यांच्या कमतरता, साक्षीदारांच्या जबाबातील खोटेपणा आणि स्थानिक द्वेष यांचा पर्दाफाश केला.
२८ जानेवारी २०२१ रोजी उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने (न्यायमूर्ती कौशल जयेंद्र ठाकर आणि गौतम चौधरी) स्पष्ट केले की आरोपीला चुकीने दोषी ठरवण्यात आले आहे. त्यामुळे खालच्या न्यायालयाचा निकाल रद्द करून विश्नू तिवारी यांची निर्दोष मुक्तता जाहीर झाली.
जेव्हा ४३ वर्षांच्या विश्नू यांनी आग्रा जेलच्या गेटबाहेर पाऊल टाकले. आझादीच्या क्षणी आनंदाऐवजी डोळ्यात अश्रू आणि मनात रिकामेपणा होता. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, लाखो लोकांनी पाहिला. “न्याय उशिरा मिळाला तरी मिळाला, पण कुटुंब परत आणता येणार नाही,” अशा प्रतिक्रिया आल्या.
ही घटना न्यायव्यवस्थेतील उशीर, खोट्या आरोपांचे गंभीर परिणाम आणि निर्दोष व्यक्तींच्या जीवनावर होणारा अन्याय यावर प्रश्न उपस्थित करते. विश्नू आता नव्याने जीवन सुरू करू इच्छितात पण हरवलेली २० वर्षे परत मिळणार नाहीत. न्याय मिळाला, पण गेलेला वेळ मागे येऊ शकत नाही.











