भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित परेडमध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या बसण्याच्या व्यवस्थेवरून वाद निर्माण झाला. काँग्रेस खासदार तारिक अन्वर यांनी राहुल गांधींना पुढच्या रांगेत का बसवले नाही असा प्रश्न उपस्थित केला.
ते म्हणाले, “राहुल गांधींना प्रजासत्ताक दिनी पुढच्या रांगेत बसवले नव्हते. हे दुःखद सत्य आहे. विरोधी पक्षनेत्यासाठी हा एक प्रोटोकॉल आहे.त्याला शॅडो पंतप्रधान म्हणूनही ओळखले जाते.”
काँग्रेस खासदार म्हणाले की, “नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशातील सर्व परंपरा रद्द केल्या जात आहेत. अशा सरकारी कार्यक्रमात मुख्य विरोधी पक्षाच्या नेत्याला दुसऱ्या किंवा तिसऱ्या रांगेत बसवले जाईल असे कधीच घडलेले नाही. आपण मोठ्या प्रमाणात ब्रिटिश पद्धतीचा अवलंब केला असल्याने, विरोधी पक्षनेत्याला शॅडो पंतप्रधान म्हटले जाते.”
अन्वर म्हणाले, “येथे उलट आहे. विरोधी पक्षनेत्याला संसदेत बोलण्याची परवानगी नाही. सरकारी कामकाजात त्यांना योग्य स्थान दिले जात नाही. ही आपल्या लोकशाहीसाठी चांगली परंपरा नाही.” प्रजासत्ताक दिनाच्या परेडचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान हे पुढच्या रांगेत बसलेले दिसत आहेत.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना म्हटले आहे की, भारतीय संविधान हे प्रत्येक नागरिकाच्या हक्कांचे रक्षण करणारे आहे आणि त्याचे रक्षण करणे हीच स्वातंत्र्यसैनिकांना खरी श्रद्धांजली असेल. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहे की, “प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा. आपले संविधान हे प्रत्येक भारतीयाचे सर्वात मोठे शस्त्र आहे – ते आपला आवाज आहे, आपल्या हक्कांचे रक्षण करते. आपले प्रजासत्ताक त्याच्या मजबूत पायावर उभे आहे, जे केवळ समानता आणि सौहार्दाने मजबूत झाले आहे.”











