April 20, 2026 12:49 am

आलोकच्या गर्भवती पत्नीचा टाहो, दिग्गज नेत्याची काळीज चिरणारी पोस्ट

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

किरकोळ वादानंतर मालाड रेल्वे स्थानकात मुंबई लोकल ट्रेन उभी असताना धारदार शस्त्राने वार करुन ३२ वर्षीय शिक्षकाची हत्या झाल्याच्या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. विधानपरिषदेवर शिक्षक आमदार राहिलेले दिग्गज नेते कपिल पाटील यांनी सोशल मीडियावरुन या निमित्ताने विचार मांडले आहेत. आलोकच्या गर्भवती पत्नीचं काय होईल, या विषयी त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्याचवेळी आरोपी ओमकार शिंदे याच्या मनस्थितीबद्दलही त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 

कपिल पाटील यांची फेसबुक पोस्ट काय?

ट्रेनमध्ये धक्के कधी लागत नव्हते ? पण आता धक्काही सहन होत नाही. लोकांचे पेशन्स संपत चालले आहेत. किरकोळ कारणांवरून माणसं घायकुतीला येतात. 27 वर्षांच्या ओमकार शिंदेने धारदार शस्त्राने 32 वर्षांच्या प्रा. आलोक कुमार सिंह यांचा बळी घेतला. प्रतिष्ठित एन. एम. कॉलेजमध्ये तो गणित शिकवायचा. दोन वर्षांपूर्वी तो लेक्चरर म्हणून लागला होता. त्याचे प्राचार्य पराग आजगावकर सांगत होते, कोणत्याच भानगडीत न पडणारा, अत्यंत सालस पण तितकाच बुद्धिमान शिक्षक.ट्रेनमधून अनेकदा दारात लटकून सगळेच प्रवास करतात. मीही केलाय लटकत. लटकणार्‍यांना लोक हाताने आधार द्यायचे.

 

पोलिसांनी अवघ्या 12 तासात मारणार्‍याला शोधून काढलं. पोलिसांचं कौतुकच. ओमकार शिंदे असं का वागला ? कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती त्याची, तरीही जीवघेण्याचा गुन्हा त्याच्याकडून का घडला ? पोलीस शोधताहेत.

 

दोन – अडीच महिन्यांपूर्वीची घटना आहे, ‘भाई थोडा आगे हो जाओ, धक्का लग रहा है।’ एवढंच 19 वर्षांचा अर्णव खैरे बोलला. हिंदीत का बोलतो, म्हणून त्याला मराठी मुलांनीच ट्रेनमध्ये मारहाण केली. अपमान आणि भीतीच्या धक्क्याने कोवळ्या अर्णवने राहत्या घरी गळफास घेतला.

 

मालाडच्या घटनेला रंग देण्याची गरज नाही. पण माणसं घायकुतीला येतात. पेशन्स हरवतात. राग अनावर होतो. धारदार शस्त्राने थेट पोटात वार होतो. एका तरुण शिक्षकाचा बळी जातो. लोकही मध्ये पडत नाहीत. मारणार्‍याचे हात धरत नाहीत. माणसं प्रचंड भयाखाली जगताहेत. संशयाने पाहताहेत. एका बाजूला लोकलचा ताण, प्रचंड धावपळ, सुधारणांची शक्यता नाही. चिकटून एकमेकांचा घाम एकमेकात रिचवून प्रवास करणार्‍यांची मनं मात्र आता एकमेकांपासून कोसो दूर गेली आहेत.

 

कशामुळे हे घडतंय? अशांततेचे सोपे फंडे शोधतात आमचे नेते. त्यांच्या राजकारणासाठी. पण अप्रत्यक्षपणे ते लोकमनावर खोल परिणाम करत जातात. प्रचंड स्ट्रेस, घरा- दारातले आणि प्रवासातले ताण – तणाव, संशय आणि द्वेष एकाबाजूला. तर दुसऱ्या बाजूला जगण्याची साधनं, उत्पन्न अत्यंत मर्यादित. अशा विलक्षण कोंडीत सापडलेल्या माणसांचा स्फोट होतो.

 

गेले काही महीने भाषा, प्रांत आणि धर्माच्या नावाने कंठाळी गदारोळ सुरू आहे. मी मराठी तो भैय्या, मी हिंदू तो मुसलमान. आपली सहनशिलता आणि सहिष्णुता पार हरवून गेली आहे. मनात साचलेल्या रागाला आपल्याच सारख्या दुसर्‍या कष्टकरी माणसाला शत्रू बनवलं आहे. मारणारा ओमकार दिवसभर कष्ट करून किती कमवत असेल ? 15 – 16 हजार. पण आलोक सिंहचा पगार तरी किती होता ? तोही ज्युनिअर कॉलेजला कंत्राटी शिक्षक. जेमतेम 20 हजार. ओमकार 12वी पास होता, कोकणी मुलगा. पण ओमकारला राग व्यवस्थेचा येत नाही, आलोकचा येतो.

 

कुणीतरी त्याला तसं सांगितलेलं असतं. आपल्या घरातलं कुणीतरी रोज लोकल ट्रेनने प्रवास करत असतं, त्याची काळजी आपणच व्हायला हवी. सहनशिलता आणि सहिष्णुता त्याला शिकवली नाही तर वार कुणावरही होऊ शकतो. व्यवस्थेवर मात्र कधीच होत नाही. आपला मुलगा कोणावर तरी राग काढतो. त्याच्या हातून काही अघटीत घडतं. मग आपला मुलगाही वाचत नाही. नेत्यांच्या मुलांवर साधी केसही होत नाही.

 

आलोक सिंहच्या पार्थिव शरीराचं दर्शन घेत होतो. त्याच्या वडिलांचा आणि गर्भार पत्नीचा टाहो काळजाला चीर पाडत होता. त्याच्या गर्भार पत्नीचं काय होईल? महिलांसमोर अपमान झाला या रागातून ओमकार सणकला. पुरुषी मानसिकता आणि दुसऱ्याचा द्वेष या दोघांचं कॉकटेल विषारी बनतं. आत्मघातकी बनतं. त्यातून टोकाची प्रतिक्रिया उमटते. कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना ओमकार सारख्या तरुणाकडून गुन्हा घडतो, हे अधिक गंभीर आहे. आलोक आपल्या शेजारच्याच घरातला आणि ओमकार आपल्या घरातलाच.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!