महाराष्ट्राच्या राजकारणात मुंब्रा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलिमीन (एआयएमआयएम) पक्षाच्या मुंब्रामधील २२ वर्षीय सर्वात तरुण नगरसेविका सेहर शेख यांच्या विजयानंतर दिलेल्या भाषणामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या भाषणातील “पेंट मुंब्रा ग्रीन” या घोषणेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यावरून राजकीय वातावरण तापले आहे.
विजयानंतर आयोजित सत्कार समारंभात बोलताना सेहर शेख यांनी आगामी पाच वर्षांसाठी मोठा संकल्प जाहीर केला. त्या म्हणाल्या, “पुढील पाच वर्षांत मुंब्रामधील प्रत्येक उमेदवार एआयएमआयएमचाच असेल. मुंब्रा पूर्णपणे हिरव्या रंगात रंगवला पाहिजे.” या वक्तव्यामुळे विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, याला धार्मिक रंग देत टीका सुरू झाली आहे.
नवनीत राणांची आक्रमक प्रतिक्रिया
या वादग्रस्त विधानावर माजी खासदार नवनीत राणा यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. सेहर शेख यांच्या वक्तव्यावर टीका करताना नवनीत राणा म्हणाल्या, “कोणी कितीही म्हटलं की आम्ही ते हिरवं करू, तरी त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी चालतो. या देशातून कोणीही भगवा काढून टाकू शकत नाही. जर तुम्हाला पूर्णपणे हिरवं करायचं असेल, तर पाकिस्तानात जा. या देशात फक्त भगवा आणि निळाच चालेल.”
नवनीत राणांच्या या विधानानंतर राजकीय प्रतिक्रिया आणखी तीव्र झाल्या असून, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे.
सोशल मीडियावर जोरदार चर्चा
सेहर शेख यांचे भाषण आणि नवनीत राणांची प्रतिक्रिया दोन्हीही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. समर्थकांकडून सेहर शेख यांच्या वक्तव्याचे समर्थन केले जात असले, तरी अनेकांनी या विधानावर धार्मिक ध्रुवीकरणाचा आरोप केला आहे. तर नवनीत राणांचे समर्थक त्यांच्या आक्रमक भूमिकेचे कौतुक करत आहेत.
राजकीय वर्तुळात खळबळ
मुंब्रा हा संवेदनशील आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा परिसर मानला जातो. त्यामुळे या विधानांमुळे येत्या काळात स्थानिक राजकारण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात या प्रकरणावर पक्षीय पातळीवर काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











