मुंबई : मुंबईतील मेट्रो लाईन 2बी डीएन नगर ते मानखुर्दमधील मांडले पर्यंतच्या शून्य पुलाचं काम शेवटच्या टप्प्यात आलं आहे. मुंबईतील मेट्रो लाईन 2 बी वरील शून्य पुलाचा अंतिम खांब बसवण्यात आला आहे. या शेवटच्या पायलॉनच्या यशस्वी उभारणीसह या शून्य पुलाच्या बांधकामातील एक मोठा टप्पा पार पडला आहे. पायलॉन या रचनेमुळे या पुलाला त्याचा विशिष्ट आकार मिळाला आहे. हा आकार शून्य स्वरूपाचा आहे. त्यामुळेच जगाला शून्याची ओळख करुन देणाऱ्या, शून्याची संकल्पना मांडणाऱ्या प्राचीन भारतीय गणितज्ञ आर्यभट्ट यांना श्रद्धांजली म्हणून हा पूल कल्पित आहे.
हा शून्य पूल 130 मीटर लांबीचा केबल-स्टेड प्रकाराचा पूल आहे. या पुलासाठी 750 टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. प्रगत अभियांत्रिकीचा वापर करून हा पूल तयार करण्यात आला आहे. 130 मीटर लांबीच्या या केबल-स्टेड पुलाला वाकोला नाल्यावर 80 मीटरचा मुख्य स्पॅन आहे आणि त्याला 40 मीटर उंच स्टीलच्या पायलॉनचा आधार आहे. पुलाची ही रचना उच्च दर्जाची अभियांत्रिकी आहे. या प्रकल्पात प्रगत अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला आहे.
बांधकामाची गुंतागुंत
या पुलाच्या बांधकामाबाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पुलाच्या बांधकामात अनेक तांत्रिक अडचणी होत्या. बांधकाम प्रक्रियेत सुमारे 5.9 किलोमीटरचे गुंतागुंतीचे, क्लिष्ट ऑन-साईट वेल्डिंग करण्यात आलं आहे. ही प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या खूप आव्हानात्मक होती. पुलाचा अंतिम, क्राऊन एलिमेंट बनवण्यासाठी ७५०-मेट्रिक टन आणि ३५०-मेट्रिक टन क्षमतेच्या दोन मोठ्या क्रेन वापरण्यात आल्या. या क्रेनमध्ये सुपर-लिफ्ट सिस्टीम अर्थात अधिक वजन उचलण्याची क्षमता आहे.
या पुलामुळे मुंबईतील पूर्व आणि पश्चिम कनेक्टिव्हिटी सुधारेल. हा पूल एक सार्वजनिक वाहतूक पायाभूत सुविधा म्हणून ओळखला जाईल. तसंच मेट्रो 2 बी कॉरिडॉरवरील पाच स्थानकंही प्रवाशांसाठी लवकरच खुली होणार आहेत. त्यानंतर या पुलाचा अधिकच फायदा होणार आहे. हा ‘शून्य पूल’ सुरू झाल्यावर मेट्रो 2 बी कॉरिडॉरवर एक महत्त्वाचं ठिकाण बनेल.
मुंबईतील पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी डिझाइन केलेला हा पूल केवळ एक बांधकाम नाही, तर तो कार्यक्षमता, नावीन्य, नवीन कल्पना आणि मुंबईच्या सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक, मुंबईची सांस्कृतिक प्रतिकात्मकता दर्शवतो.
दरम्यान, मेट्रो लाईन 2 बी ची पाच स्थानकं प्रवासी सेवेसाठी जवळजवळ तयार आहेत. ही स्थानके लवकरच सुरू होतील. मात्र, त्याआधी मेट्रो रेल सुरक्षा आयोगाच्या सर्व नियमांचं पालन करावं लागेल. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच ही स्थानके लोकांसाठी खुली केली जातील.











