राज्यात 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. बहुसंख्य ठिकाणी भाजपा हाच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मुंबई तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा यांच्या महायुतीने सत्ता काबीज केली आहे. मुंबईत महायुतीमध्ये सध्या महापौरपदाच्या निवडीवर चर्चा चालू आहे. असे असतानाच आता संपूर्ण राज्याला हादरवणारी माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे तीन नगरसेवक फोडले आहेत. सूत्रांनी तसे सांगितले आहे.
नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार सध्या कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. येथे आपल्याच पक्षाचा महापौर व्हावा यासाठी घोडेबाजार चालू झाला आहे. या महापालिकेत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेले नाही. असे असताना आता ठाकरे यांचे 11 आणि मनसेच्या 5 नगरसेवकांना खूप महत्त्व आले आहे. हे सोळा नगरसेवक ज्या पक्षाच्या बाजूने उभे राहणार, त्यांचीच सत्ता या महापालिकेवर येणार आहे. त्यामुळे आता ठाकरे आणि मनसेचे नगरसेवक फोडण्यासाठी मोठी चढाओढ सुरू झाली आहे. यात एकनाथ शिंदे यांचे तीन नगरसेवक फुटले आहेत,असे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
नेमके कोणाचे किती नगरसेवक फुटले आहेत?
मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला कल्याण डोंबिवलीत फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. शिंदे यांच्या पक्षाने ठाकरे गटातील तीन नगरसेवक फोडले आहेत. तसे सूत्रांकडून सांगितले जात आहे. शिंदे यांच्या पक्षाचे पुत्र तथा खासदार श्रीकांत शिंदे आणि ठाकरे यांच्या पक्षाकडून निवडून आलेल्यांपैकी मधूर मात्रे यांची भेट झाली आहे. या भेटीचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. मधूर मात्रे यांच्यासोबतच नगरसेविका कीर्ती ढोणे आणि रेशमा निचळ हे शिंदे यांच्या पक्षाच्या संपर्कात आहेत.
कोणाकडे किती नगरसेवक?
कल्याण डोंबिवली येथे सत्ता स्थापन करायची असेल तर 62 हा बहुमताचा जादुई आकडा गाठणे महत्त्वाचे आहे. सध्या शिंदे यांच्या शिवसेनेकडे 53 नगरसेवक आहेत. तर भाजपाकडे 50 नगरसेवक आहेत. ठाकरे गटाचे येथे एकूण 11 तर मनसेचे 5 नगरसेवक आहेत. आता ठाकरे यांचे तीन नगरसेवक फुटल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.











